अंबरनाथमध्ये चक्क पोलीस चौकीत मिठाईचं दुकान उघडलं आहे. टीडीआरच्या प्लॉटवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गाळ्यांना आधी पोलीस चौकीचा बोर्ड लावण्यात आला, अन आता बाजूला अनधिकृत पोलीस चौकी बांधून गाळ्यांमध्ये मिठाईचं भलंमोठं दुकान सुरू करण्यात आलं आहे. अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचं या सगळ्याला पाठबळ आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंबरनाथ बदलापूर मुख्य रस्त्यावर वडवली तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरचा भूखंड पालिकेनं अधिग्रहित करून त्याबदल्यात जागा मालकाला टीडीआर दिला आहे. मात्र पालिकेनं ही जागा तशीच मोकळी ठेवल्यानं काही भूमाफियांनी या जागेवर अतिक्रमण करत पत्र्याचे भलेमोठे गाळे बांधले. गाळे बांधत असताना त्याच्यावर कारवाई होऊ नये, म्हणून पोलीस चौकी असा बोर्ड लावला. पण नंतर बाजूला छोटी पोलीस चौकी बांधून बोर्ड तिकडे शिफ्ट झाला आणि गाळ्यांवर मिठाईच्या दुकानाचा बोर्ड लागला.
नक्की वाचा - Badlapur Home : बदलापुरात घरे महागणार; पंतप्रधान आवास योजनेतील 8 लाखांचं घर दुपटीने महागलं
त्यामुळं अंबरनाथ पालिकेला भूमाफियांनी अक्षरशः चुना लावला आहे. वास्तविक या गाळ्यांसोबतच पोलीस चौकी सुद्धा अनधिकृत असून यापूर्वी अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावर अशा अनधिकृत पोलीस चौकीवर पालिकेनं कारवाई केलेली आहे. त्यामुळे आता ही पोलीस चौकी आणि अनधिकृत गाळ्यांवर सुद्धा पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. ही जागा खासगी असल्याचा कांगावा सध्या केला जात असून तरी देखील खासगी जागेत अनधिकृत गाळे उभारलेले चालतात का? हा प्रश्नच आहे. त्यामुळं मुख्याधिकाऱ्यांनी आता या अनधिकृत पोलीस चौकी आणि मिठाईच्या दुकानांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.