कामाच्या ठिकाणी टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर असलेला दबाव हा सध्या काळजीचा विषय बनला आहे. पुण्यातील Ernst & Young कंपनीच्या एका 26 वर्षीय चार्टर्ड अकाऊंटन्ट (Chartered Accountant) अॅना सेबेस्टियन या 26 वर्षांच्या तरुणीचा या कारणामुळे मृत्यू झाला असा आरोप तिच्या आईनं केला होता. त्यापाठोपाठ लखनौमधील HDFC बँकेत काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याचा कामाच्या ठिकाणी संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटना ताज्या असतनाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशीमधील एका फायनान्स कंपनीच्या एरिया मॅनेजरनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळावरुन 5 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून माझ्यावर रिकव्हरी टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव होता. टार्गेट पूर्ण झालं नाही तर पगार कट करण्याची धमकी देण्यात येत होती. त्याला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं लिहिण्यात आलं आहे.
तरुण सक्सेना (वय 42) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो झाशीमधील एका फायनान्स कंपनीमध्ये एरिया मॅनेजर होते. त्यांना एक मुलगी आणि मुलगा आहे. त्यांचे वडिल मेडिकल कॉलेजमधील रिटायर्ड क्लार्क आहेत. सकाळी घरात कामवाली आली त्यावेळी तिनं सक्सेना यांचा मृतदेह फासावर लटकलेला दिसला. सक्सेना आणि मुलं दुसऱ्या खोलीत होती. त्यांनी त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोलकरणीनं आरडाओरड करत शेजारच्यांना बोलावले. त्यांनी दुसऱ्या खोलीत बंद असलेल्या पत्नी आणि मुलांना बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
चिठ्ठीतील मजकूर काय?
सक्सेना यांनी त्यांच्या पत्नीला संबोधित आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली आहे. त्यानुसार, पूर्ण प्रयत्न करुनही टार्गेट पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रचंड तणावात असल्याचं सांगितलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेकदा माझा अपमान केला. मी भविष्याबाबत प्रचंड काळजीत आहे. मी काहीही करु शकत नाही. मी जात आहे.'
'मी 45 दिवस झोपलेलो नाही. कसंबसं जेवण करत आहे. मी खूप तणाव आहे. सीनियर मॅनेजर कोणत्याही पद्धतीनं टार्गेट पूर्ण कर किंवा नोकरी सोड असा दबाव माझ्यावर टाकत आहेत, ' असा आरोप तरुण सक्सेना यांनी केला.
( नक्की वाचा : कामाच्या तणावामुळे आणखी एक मृत्यू? HDFC बँकेतील अधिकारी खुर्चीवरुन पडली आणि.... )
आई-वडिलांना विनंती
तरुण सक्सेना यांनी या चिठ्ठीमध्ये त्यांच्या आई-वडिलांना एक विनंती केली आहे. 'मी मुलांच्या शाळेची फी या वर्षाअखेरपर्यंत भरली आहे. मी सर्व सदस्यांनी माफी मागतो. तुम्ही सर्वांनी मेघा, यथार्ड आणि पीहूची काळजी घ्या.
मम्मी, पप्पा मी तुमच्याकडं कधी काही मागितलं नाही. पण आज मागतो. कृपया दुसरा मजला बांधा. तिथं माझं कुटुंब आरामात राहू शकेल,' अशी विनंती तरुण यांनी केली आहे.