Badlapur News : रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बदलापूरजवळच्या जांभळे गावात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलीये.
टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन परताना महिलेचा दुर्देवी मृत्यू
अरुणा अरुण कुलकर्णी असं या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ५० वर्षीय महिलेचं नाव आहे. त्या कल्याणच्या एकविरा नगर, रामदास सोसायटी इथं राहात होत्या. २८ जून रोजी रात्री त्या मुलगा प्रतीक कुलकर्णी याच्यासोबत दुचाकीवर टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. तिथून परतत असताना जांभळे गावाजवळील नदीवरील पुलावर रस्त्यात अचानक खड्डा आला. त्यामुळे प्रतीक कुलकर्णी याने ब्रेक मारला, पण दुचाकी तत्काळ न थांबल्यामुळे तोल जाऊन दुचाकी खड्ड्यात पडली.
नक्की वाचा - Mumbai News : मुंबईकरांवरील विघ्न संपेना! कोसळलेलं झाड पाहायला गेलेल्यांवरच 'संक्रांत'; 9 जणं रुग्णालयात भरती
या अपघातात मागे बसलेल्या अरुणा कुलकर्णी खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने बदलापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे.