Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे तीन निष्पाप भाऊ-बहिणींचा एकत्र मृत्यू आणि त्यानंतर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आलं. हे दृश्य पाहून गावकरी भावुक झाले. अनेर नदीमध्ये बुडून मृत्यू झालेल्या या लहानग्यावरील अंत्यसंस्कारावेळी अख्खं गाव शोकाकुल झालं होतं.
ही हृदयद्रावक घटना बडवानी जिल्ह्यातील वरला तालुक्यातील बिलवा गावात घडली. बुधवारी मामाच्या घरी सुट्टीसाठी आलेले तीन भाऊ-बहीण अनेर नदीमध्ये पोहोचला गेले होते. पोहोताना ते खोल पाणीत गेले आणि पाहता पाहता ते दिसेनासे झाले. कुणाला काही कळायच्या आधीच तिघेही नदीत बुडाले.
लग्नाच्या घरातून निघाली अंत्ययात्रा...
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळी गावाचे निवासी पवन ब्राम्हणे पत्नी आणि मुलांसह नातेवाईकांच्या गावी आले होते. त्यांची मोठी मुलगी आधीपासून मामाच्या घरी होती. तिन्ही मुलं बहिणीला भेटायला गेले आणि उशीर झाला तरी घरी न आल्यानं कुटुंबीय चिंतेत होते. कुटुंबीयांनी मुलांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान नदीच्या किनाऱ्यावर मुलांचे कपडे आणि चप्पला दिसल्या. ज्यानंतर त्यांना संशय आला. यानंतर स्थानिकांनी नदीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं, यानंतर तीन मुलांचे मृतदेह सापडले.
देवळी गावात तिन्ही सख्खा भाऊ-बहिणींवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आला. हे दृश्य पाहून अनेकांना शोक अनावर झाला. आपल्या तिन्ही मुलांना गमावल्याचं दु:ख आई-वडिलांच्या आक्रोशमधून दिसत होतं.