आकाश सावंत
13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं एकदा नाही तर दोनदा लग्न लावून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार बीडमधील शिवाजीनगर हद्दीद घडला आहे. मात्र हा डाव सामाजिक संस्थांच्या लक्षात आल्यानंतर तो उधळवून लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मुलीचे पहिले लग्न ज्या वक्ती बरोबर लावले जात होते तो जवळपास 30 ते 35 वर्षाचा होता. पण खरा ड्रामा पुढे झाला. पोलिसही या प्रकरणामुळे हैराण झाले आहेत. या प्रकरणी जवळपास 22 जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पुढे आल्यानंतर बालविवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना बीडच्या शिवाजीनगर इथं घडली आहे. 13 वर्षाच्या मुलीचं लग्न लावलं जात होतं. लग्न ज्याच्या बरोबर लावलं जात होतं तो 30 ते 35 वर्षाचा माणूस होता. शिवाय त्याचं आधी लग्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्या विरोधात केसही सुरू होती. शिवाय त्याच्या विरोधात वॉरंटही होता. अशा वेळी तो लग्न करत होता. लग्न झाल्यानंतर आपल्या माघावर पोलिस आहेत हे त्याला समजल्यानंतर त्याने लग्न झाल्या झाल्या तिथून पळ काढला. बीड शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली. मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले. पहिला विवाह 32 वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला. तो विवाह झाला देखील मात्र या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली. त्यामुळे त्याने तिथून पळ काढला.
पहिला नवरा पळून गेला. त्याच वेळी त्याच्या जागी दुसरा डमी नवरा उभा करण्यात आला. जेणे करून त्याचे वय लक्षात येणार नाही. पण त्याच वेळी या लग्नाची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी त्याची तातडीने दखल घेतली. महिला अधिकाऱ्यांना संबंधीत ठिकाणी पाठवण्यात आलं. लग्न लावून सर्व जण पळून जाण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी पोलिसांनी त्या सर्वांना थांबवलं. त्यांची चौकशी केली. त्यानंतर पाचवीत शिकत असलेल्या मुलीचे दोन वेळा लग्न लावले गेल्याचे समोर आले. पहिला नवरा पळाल्यामुळे दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलविण्यात आला. त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला. याची माहिती प्रशासनाला मिळताच, पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर अडवून ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी नवऱ्यासह इतर कुटुंबीयांना ताब्यात घेतलं. त्यांच्या विरुद्ध गुन्हा ही दाखल करण्यात आला. एकूण 22 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार शाहूनगर परिसरात घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.