- जयराम चाटे सध्या जेलमध्ये आहे. त्याला भावाच्या बाराव्यासाठी काही तासांची सुट्टी त्याला देण्यात आली
- जयराम चाटेच्या समर्थकांनी त्यांच्या मुळ गावात धुडगूस घालत एका व्यक्तीवर जुना वादातून जबर मारहाण केली
- केज तालुक्यातील तांबवा परिसरात पाच जणांनी संग्राम चाटे यावर डोक्यात वार करून गंभीर मारहाण केली
आकाश सावंत
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात जयराम चाटे हा सध्या जेलची हवा खात आहे. त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर त्याला त्याच्या तेराव्यासाठी जाण्याची परवानगी देण्यात आली. काही तासासाठी चाटे जेलच्या बाहेर येणार होता. त्या आधीच्या त्याच्या समर्थकांनी त्याच्या मुळ गावी धुडगूस घालण्यास सुरूवात केली. जयराम चाटेच्या टोळीतील काही गुंडानी गावातील एका व्यक्तीला जुन्या वादातून जबर मारहाण केली. शिवाय जयराम चाटे तुमच्या सर्वांचा बाप आहे. तो परत येतो अशी धमकी ही दिली. यावरून बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.
बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात गुरूवारी दुपारी पाच जणांनी संग्राम चाटे या तरुणाला अडवले. शिवाया त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तुला माज आला आहे का? असं ही ते म्हणाले. त्यानंतर त्यातील एकाने संग्राम याच्यावर डोक्यात वार केला. एकाने डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. तुला आज जिवंतच मारतो असं ते त्याला सांगत होते. हा पाच ही जण जयराम चाटेच्या टोळीचे असल्याचं सांगितलं जात आहे.
मारहाण करताना ते सांगत होते तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो असे म्हणत ते मारहाण करत होते. यामध्ये तरूण संग्राम चाटे गंभीररीत्या जखमी झाला. मारहाण करून त्याला तिथेच टाकून देण्यात आले. संग्रामचा मित्र त्यावेळी तिथे आला. त्याने त्याला पाणी पाजले. इतरांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेले. मात्र पोलीस केस असल्यामुळे त्यांना पोलीसांचे पत्र घेवून येण्यास सांगण्यात आले.
पण पत्र मिळाल्यानंतर त्याच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याप्रकरणी केज पोलिसात पाच आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दया चाटे, शरद चाटे, अमोल ठोंबरे,सागर चाटे, गोट्या भालेराव असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.जरी जयराम चाटे जेलमध्ये असला तरी त्याच्या टोळीचा माज कमी झालेला नाही हेच या घटनेवरून स्पष्ट होत आहे. चाटेच्या नावाने दहशत माजवण्याचा प्रकरा सुरू आहे.