अमोल पाटील, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar Murder Case: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. ज्या मित्रांसोबत अवघ्या दोन तासांपूर्वी हसून-खेळून फोटो काढले, गप्पा मारल्या आणि ज्यांच्यावरील विश्वासापोटी सोशल मीडियावर स्टेटस ठेवले, त्याच मित्रांनी एका तरुणाची हत्या केली. मैत्रीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पुंडलिक नगर भागातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काय आहे प्रकरण?
रोहित उर्फ करण रवी म्हस्के असे या मृत तरुणाचे नाव आहे. रोहित आणि त्याच्या काही मित्रांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जुन्या कारणावरून वाद सुरू होते. मात्र, काल रात्री (मंगळवार, 21 एप्रिल) या मित्रांनी रोहितला विश्वासात घेऊन आपल्यासोबत घेतले. सर्वांनी मिळून गप्पा मारल्या आणि एकत्र फोटोही काढले. रोहितने आपल्या मित्रांवर विश्वास ठेवत या फोटोंचे स्टेटस आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ठेवले. मात्र, हे स्टेटस ठेवल्यानंतर अवघ्या 2 तासांच्या आतच जुन्या वादाचा वचपा काढण्याचे भयानक कारस्थान रचले.
( नक्की वाचा : Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम' )
पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कारगिल मैदानावर ही घटना घडली. संशयित आरोपींनी रोहितला गाठून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की रोहितचा जागीच मृत्यू झाला. ज्या मित्रांसोबत तो काही वेळापूर्वी आनंदात होता, त्यांनीच त्याचा खेळ खाल्लास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत रोहित म्हस्के हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, वर्चस्व किंवा जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा संशय आहे.
( नक्की वाचा : Pune News: हिंजवडीत नाशिक प्रकरणाची पुनरावृत्ती? IT कंपन्यांमधील 'त्या' धक्कादायक प्रकाराची थेट सरकारकडून दखल )
पोलिसांकडून 5 आरोपींना बेड्या
या घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी या प्रकरणी कृष्णा उदावंत, सागर घुले, बादशहा शेख, प्रफुल्ल पाखरे आणि शोएब शेख या 5 जणांना अटक केली आहे. या हत्येतील सहावा आरोपी अक्षय पडूळ हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच याच परिसरात गोळीबाराची घटना घडली होती आणि आता ही हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.