राव कोचिंग इन्स्टिट्यूला 19 दिवसांपूर्वी कशी मिळाली NOC? विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

सिस्टम बदलण्याचं...IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिल्लीत दाखल झालेली ती तिघंही जणं सिस्टमचीच बळी ठरली.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

दिल्लीतील (Delhi News) जुन्या राजेंद्र नगरमधील तळघरात तीन जीवांचा अंत झाला. सिस्टम बदलण्याचं...IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिल्लीत दाखल झालेली ती तिघंही जणं सिस्टमचीच बळी ठरली. व्यवस्थेच्या अभावामुळे तीन UPSC च्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इतर विद्यार्थ्यांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे. 

विद्यार्थ्यांनी सांगितलं की, येथे लायब्ररी तळघरातच तयार करण्यात आली आहे. आम्ही दररोज तळघरात जाऊनच अभ्यास करतो. आता आम्ही घाबरून अभ्यास करायचा का? सरकारसाठी विद्यार्थ्यांचं आयुष्य क्षुल्लक आहे. या परिसरात तळघरात वर्ग होत आले आहेत. मात्र कोणीच याची जबाबदारी घेत नाही, असं म्हणत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. 

नक्की वाचा - विकास दिव्यकीर्तिंचं दृष्टी IAS कोचिंग सेंटर सील; दिल्ली पालिकेची मोठी कारवाई

राव कोचिंग इन्स्टिट्यूटला NOC कशी मिळाली?
यापूर्वी राव कोचिंग इन्स्टिट्यूटला इशारा देण्यात आला होता. मात्र तरीही घटनेच्या अवघ्या 19 दिवसांपूर्वी फायर विभागाने त्यांना NOC जारी केली होती. या तपासादरम्यान विभागाला जळघरातील लायब्ररी दिसली नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत दिल्ली फायर विभागाचे डीजी अतुल गर्ग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, जेव्हा आम्ही इथं गेलो तेव्हा तळघरातील टेबल-खुर्च्या उलट्या ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय काही पुस्तकही होती. सेंटरने सांगितलं की, ते या जागेचा उपयोग अडगळीची खोली म्हणून करतात. कोचिंग सेंटरने आम्हाला चुकीची माहिती दिली होती. याच्या आधारावर आम्ही त्यांची एनओसीदेखील रद्द केली आहे.   

राव कोचिंग सेंटरच्या तळघराबाबत किशोर सिंह यांनी महिनाभरापूर्वी तक्रार दाखल केली होती. वेळीच यावर कारवाई केली असतील तर तीन निरपराधांचे जीव वाचले असते असंही ते म्हणाले.  

Advertisement