- शेकापूर गावात एक भोंदुबाबा दर शनिवारी लोकांना भुतबाधा आणि आजार बरे करण्याचा दावा करतो
- तो उपचाराच्या नावाखाली लोकांचा अमानुष छळ करतो आणि भूत उतरवण्याचे ढोंग करत लोकांची फसवणूक करतो
- भोंदुबाबा लोकांना पाण्याची बाटली आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण देऊन आजार आणि दैवी कोप दूर करण्याचा दावा करतो
ओंकार कुलकर्णी
अंधश्रद्धा निर्मुलन कायदा राज्यात लागू आहे. पण असं असलं तरी भोंदुबाब, जादूटोणा, भूताटकी घालवणे याचे प्रकार सर्रास सुरू आहे. यापासून लांब राहा असं आवाहन केल्यानंतर ही लोक या भोंदूबाबांच्या आहारी जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना धाराशिव जिल्यातील भुम तालुक्यात समोर आली आहे. इथं एक भोंदुबाब उपचाराच्या नावाखाली भलत्याच गोष्टी करत आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुळे प्रशासनाची ही झोप उडाली आहे. पण कारवाई शुन्य असल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
भुम तालुक्यात शेकापूर हे गाव आहे. या गावात एक तथाकथीत भोंदू बाबा आहे. तो दर शनिवारी आपला दरबार भरवतो. या दरबारात तो भुतबाधा, दैवी कोप, मोठ मोठे आजार, त्याच्या शक्तीने बरे करतो असं सांगत लोकांची फसवणूक करत आहे. अंगात येणाऱ्या लोकांना कोण अंगात आलं आहे. तो का त्रास देत आहे याची माहिती ही देतो. हे करत असताना दरबारात उपचाराच्या नावाखाली आलेल्या या लोकांचा अमानुष छळ ही तो करतो असं व्हिडीओतून दिसत आहे.
जर मोठा आजार असेल. अंगात देव आला असेल. भुताने झपाटले असेल तर त्यावर त्याचे रामबाण औषध ही तयार आहे. तो या भाबड्या लोकांना एक पाण्याची बॉटल, खोबरेल तेल याचे मिश्रण पाजतो. त्यातून तुमच्या अंगात असलेलं भुत, आजार, दैवी कोर बरा होतो असं तो सांगत या लोकांची फसवणूक करत आहे. लोक ही त्याच्या या गोष्टींना बळी पडत आहेत. तो भूत उतरवण्याचे ढोंग करतो. लोकांना ते ही खरं वाटतं. तिथं आलेल्या महिला पुरूष ही त्याच्या उपचारांना प्रतिसाद देतात. जणू काही खरोखर त्यांना काही झालं आहे.
याबाबत स्थानिक कार्यकर्ते गणेश अंधारे यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी या बाबत वारंवार तक्रारी ही केल्या आहेत. पण स्थानिक पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या भोंदूबाबाचा आत्मविश्वास अजून वाढत चालला आहे. त्याचा दरबार भरतो आणि तो भोळ्या भावड्या लोकांची फसवणूक करतो. या भोंदूगिरीला आता आळ कधी बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गोष्टींवर तातडीने कडक करावाई होण्याची गरज आहे. पण तसं होताना सध्या तरी दिसत नाही.