- धुळ्यात बंदी असलेल्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली
- दोन दुकानांवर छापा टाकून ६१ हजार ४४७ रुपयांच्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची उत्पादने जप्त करण्यात आली आहेत
- आरोपींविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे
नागिंद मोरे
पाकिस्तानचं धुळे कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. धुळे शहरात बंदी असलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची (कॉस्मेटिक्स) विक्री होत होती. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर दोन दुकानांवर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. अचानक झालेल्या या छापेमारीमुळे दोन्ही व्यापारी हादरले. काय घडतयं याची कल्पनाच त्यांना आली नाही. या कारवाईची बातमी वाऱ्या सारखी शहरात पसरली. यात पाकिस्तानचं नाव असल्यानं शहरात काही वेळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
या कारवाईत एकूण 61 हजार 447 रुपये किंमतीची उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. धुळ्यातील दोन व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना धुळे शहरात काही व्यापारी बंदी असलेल्या पाकिस्तानी वस्तूंची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली. त्यानंतर शहरात छापे टाकत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
श्री साई ट्रेडर्स (जय शंकर मार्केट), प्रोप्रायटर कैलास देवानंद नानकाणी (50 वर्षे) यांच्या दुकानातून 30,063 रुपये किमतीची ‘गोरी ब्युटी क्रीम', ‘चांदनी व्हाईटनिंग क्रीम' यांसारखी उत्पादने जप्त करण्यात आली. तर बिग बाजार (सार्वजनिक मार्केट): प्रोप्रायटर फजलूर रहेमान मोहम्मद सलीम अन्सारी (32 वर्षे) यांच्या दुकानातून 31, 411 रुपये किमतीची ‘गोरी ब्युटी क्रीम', ‘डबल व्हाईट', ‘फेस फ्रेश गोल्ड', ‘गोल्डन पर्ल' यांसारखी उत्पादने हस्तगत करण्यात आली. या दोन्ही व्यापाऱ्यांविरोधात विविध कलमान्वये चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईची माहिती पोलीस निरिक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे. हा बंदी असलेली पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं धुळ्यापर्यंत कशी आली. कुणी आणली. कुणाच्या सांगण्यावरून आणली गेली याचा तपास आता पोलीस करत आहेत. यावर बंदी असताना ही ती बाजारात विकली जात होती हे अधिक धक्कादायक आहे. मात्र पोलीसांनी वेळीच कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहे. पाकिस्तानसोबत भारताचे सध्याचे असलेले संबंध पाहाता ही मोठी कारवाई म्हणायला हवी.