- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहे
- सुनेत्रा पवार यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क साधला आहे
- उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे
अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार आहेत. त्यामुळे त्यांनीही सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. शिवाय निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंतही केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. शिवाय पाठिंब्यासाठी शब्द ही टाकला आहे. या एक फोननंतर ठाकरे यांनी ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जवळपास घेतल्याची सुत्रांची माहिती आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचा बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या निवडणुकीत ठाकरेंनी पाठिंबा द्यावा यासाठी स्वत: सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्ष बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जर उमेदवार देत असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा न देता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
ठाकरे आणि पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. हे संबंध लक्षात घेता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनेत्रा पवार यांना या पोटनिवडणुकी पाठिंबा दिला जाणार असल्याची अधिक शक्यता आहे. याबाबत उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती आहे. मात्र दुसरीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्यासंदर्भात महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडी एकत्रित निर्णय घेणार आहे. ही जागा लढण्याबाबत मविआ सकारात्मक आहे. त्यामुळे इथे निवडणूक होणार हे जवळपास निश्चित आहे.
बारामतीत मात्र काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवण्याची रणनिती आखली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत काँग्रेसला साथ द्यायची की सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात मत टाकायचं याचाच विचार ठाकरे करत आहेत. काँग्रेसने वंचित, रासपला सोबत घेवून बारामतीचा किल्ला लढवण्याचा निर्धार केला आहे. मविआ अजून ही अस्तित्वात आहेत. अशा वेळी ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीचे पडसाद राहुरीत उमटू शकतात. त्यामुळे ठाकरेंना कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world