- धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर गावात चोरांनी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरला, पण त्यांचा डाव फसला
- चोरीनंतर चोर ट्रॅक्टरसह साक्रीकडे निघाले, पण ट्रॅक्टरमधील डिझेल संपल्याने तो सुरू होऊ शकला नाही
- चोरांना ट्रॅक्टर खड्ड्यात सोडून पळावे लागले, ज्यामुळे ट्रॅक्टर काही अंतरावर आढळून आला
नागिंद मोरे
एखाद्याच्या कष्टाची कमाई चोरणारा चोर जेव्हा स्वतःच्या नशिबानेच हरतो, तेव्हा काय होतं? असाच काहीसा प्रकार धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये घडला आहे. चोराने चोरी केली. त्यात त्याला यश ही मिळालं. त्यामुले तो खूश होता. आपण मोठा डल्ला मारला आहे त्यामुळे पुढचे काही दिवस मजेत जातील या आविर्भावात तो होता. पण पुढे आपल्या वाट्याला काय वाढून ठेवलं आहे याची पुसटती कल्पना ही त्याने केली नसते. चोरीनंतर त्याला जी काही अद्दल घडली आहे त्याने परत कधी चोरी करणार नाही अशीच अवस्था त्याची झाली असेल.
पिंपळनेरमध्ये ही घटना घडली. गावात गणेश बागुल हे राहातात. ते शेतकरी आहेत. त्यामुळे शेतीसाठी त्यांनी ट्रॅक्टर घेतला होता. तो ट्रॅक्टर त्यांच्या दारात उभा होता. रात्रीच्या वेळी हाच ट्रॅक्टर चोरांनी चोरला. सकाळी ज्यावेळी गणेश उठले. त्यावेळी त्यांना ट्रॅक्टर जागेवर दिसला नाही. त्यांनी शोधाशोध सुरू केली. पण ट्रॅक्टर काही सापडला नाही. त्यांनी पोलीसात याची तक्रार केली. शिवाय सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात चोर ट्रॅक्टर चोरताना स्पष्ट पणे दिसत आहे. हे पाहून गणेश यांना जबर हादरा बसला. चोरट्यांनी आपल्या मेहनतीचा ट्रॅक्टर पळवला. आता पुढे काय होणार या चिंतेत ते होते.
पण खरी मजा पुढे होती. चोरट्यांनी ट्रॅक्टर चोरण्यात यश मिळले. त्यानंतर ते तो ट्रॅक्टर घेवून साक्रीच्या दिशेने सुसाट निघाले. तिथेच त्यांना ट्रॅक्टरने दगा दिला. ऐन वेळी ट्रॅक्टरमधील डिझेल संपले. त्यांनी तो सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण डिझेलच नाही तर तो सुरू होणार तरी कसा. त्यामुळे चोरांना आपला डाव फसल्याचं लक्षात आलं. आता ट्रॅक्टर आहे त्या ठिकाणी सोडल्या शिवाय त्यांच्या समोर पर्याय राहीला नव्हता. नाईलाजाने त्यांनी छाईल-बेहेड रस्त्यावरील खड्ड्यात ट्रॅक्टर सोडून पळ काढला. अशा पद्धतीने या चोरांची फजीती झाली. करायला गेले एक आणि झालं दुसरचं अशी स्थिती त्यांची झाली होती.
सीसीटीव्हीच्या आधारे हा ट्रॅक्टर कुठे गेला असेल ते समजले. त्यानुसार ट्रॅक्टरचा शोध घेण्यात आला. काही अंतरावर बागुल यांचा हा ट्रॅक्टर त्यांना सापडला. त्यामुळे त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तरी या घटनेने परिसरातील नागरिकांची चिंता वाढवली आहे. वाहनचोरी आणि जनावरांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी आता पोलीस प्रशासनाकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. शिवाय. सीसीटीव्ही लावून चोरांवर वचक बसवण्याची मागणी केली आहे. पिंपळनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.