- ED मुंबई विभागीय कार्यालयातून इक्बाल मिर्ची कुटुंबाची 700 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे
- जप्त मालमत्तांमध्ये वरळीतील तीन आलिशान इमारती आणि दुबईतील 14 रिअल इस्टेट युनिट्सचा समावेश आहे
- इक्बाल मिर्चीवर मुंबई पोलिसांनी 1994 मध्ये विविध गुन्हे दाखल केले आहे
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोमवारी एक मोठी कारवाई करत दिवंगत कुख्यात डॉन इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबावर मोठी टाच आणली आहे. आर्थिक गुन्हेगार कायद्या अंतर्गत ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने तब्बल 700.27 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील वरळी भागातील तीन आलिशान इमारती आणि दुबईतील 14 रिअल इस्टेट मालमत्तांचा समावेश आहे. या मिर्चीच्या कुटुंबीयांसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
वरळीतील मोक्याच्या जागांवर कारवाई
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये वरळी येथील 'राबिया मॅन्शन', 'मरियम लॉज' आणि 'सी व्ह्यू' या तीन महत्त्वाच्या मालमत्तांचा समावेश आहे. त्यांचे बाजारमूल्य सुमारे 497 कोटी रुपये आहे. याशिवाय, दुबईतील 'हॉटेल मिडवेस्ट अपार्टमेंट'सह एकूण 14 रिअल इस्टेट युनिट्स जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत सुमारे 203.27 कोटी रुपये आहे. ही सर्व मालमत्ता इक्बाल मिर्चीचा मुलगा आसिफ मेमन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर होती.
गुन्हेगारीच्या पैशातून उभारले साम्राज्य
इक्बाल मोहम्मद मेमन ऊर्फ इक्बाल मिर्चीविरुद्ध मुंबई पोलिसांनी 1994 मध्ये मरीन ड्राईव्ह, यलो गेट, भायखळा आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षात विविध गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला. तपासात असे समोर आले की, मिर्चीने ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्रविक्रीच्या माध्यमातून अफाट काळा पैसा कमावला होता. हा पैसा त्याने कुटुंब आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर रिअल इस्टेटमध्ये गुंतवला.
1986 मध्ये वरळीतील या जागा 'सर मोहम्मद युसूफ ट्रस्ट'कडून अवघ्या 6.50 लाख रुपयांना खरेदी करण्यात आल्या होत्या. कागदोपत्री मालकी ट्रस्टची असली, तरी प्रत्यक्ष नियंत्रण मिर्ची कुटुंबाचेच होते. यापूर्वी कोर्टाची दिशाभूल करून ही मालमत्ता सोडवून घेण्यात आली होती, असेही ईडीने स्पष्ट केले आहे. आसिफ मेमन, जुनैद मेमन आणि हाजरा मेमन यांना आधीच न्यायालयाने भगोडे आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे.