गेल्या काही दिवसांत कोल्हापूर आणि बीडमध्ये डिजिटल अरेस्टची प्रकरणं समोर आली आहेत. त्यामध्ये नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. डिजिटल अरेस्ट हा प्रकार भीती या फॅक्टरवर अटॅक करतो आणि त्या अवस्थेत तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा गमावून बसता. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने याबाबत अलर्ट राहणं आवश्यक आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापूर आणि बीडमध्ये काय झालं?
कोल्हापूरमधल्या निवृत्त प्राध्यापिकेला अज्ञात नंबरवरुन एक व्हिडीओ कॉल आला. तुमचा मोबाईल नंबर आर्थिक फसवणुकीशी संबंधित असल्याचं आढळलंय, दोन दिवसांत तुमचा मोबाईल बंद होईल, अशी धमकी देण्यात आली. व्हिडीओ कॉल एखाद्या पोलीस स्टेशनमधून केल्याचं भासवण्यात आलं. व्हिडीओ कॉलमध्ये सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी सुरू असल्याचंही भासवण्यात आलं. अनेक वेळा असे व्हिडीओ कॉल आल्यावर त्या प्राध्यापिकेनं ४० दिवसांत तब्बल ३ कोटी ५७ लाख सायबर भामट्यांना पाठवले. जेव्हा फसवणूक झाल्याचं लक्षात आलं, त्यावेळी या प्राध्यापिकेनं कोल्हापूरमधल्या राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.
बीडमध्ये सुद्धा एका शिक्षिकेचीच फसवणूक झाली
बीडमधल्या अंबाजोगाईमध्ये एका सेवानिवृत्त शिक्षिकेला व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल आला. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात तुमचं नाव आलंय आणि तुम्ही अतिरेक्यांना फंडिंग केल्याचंही समोर आलंय, असं सांगत या शिक्षिकेला धमकी देण्यात आली. हा व्हिडिओ कॉल पोलीस स्टेशनमधून करत असल्याचं भासवण्यात आलं. आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडवू, त्यासाठी आम्हाला विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी बोलावं लागेल. चौकशीला सहकार्य करा, यातून सुटायचं असेल तर पैसे भरा, असं या शिक्षिकेला सांगण्यात आलं. या शिक्षिकेकडून ९ दिवसांत तब्बल ८३ लाख उकळण्यात आले. धक्कादायक म्हणजे या शिक्षिकेनं सोनं विकून आणि तिचा फ्लॅट गहाण ठेवून ८३ लाख जमा करुन दिले.
तर हे सगळे प्रकार आहेत डिजिटल अरेस्टचे. आणि धक्कादायक म्हणजे सुशिक्षित नागरिक जसं की प्राध्यापक, शिक्षक, एवढंच नव्हे तर आयटी क्षेत्रात काम करणारे, इंजिनिअर्स असे सगळे या डिजिटल अरेस्टचे बळी ठरतायेत.
नक्की वाचा - Pune Crime : सरपंचाच्या पतीकडून ज्येष्ठाची 6 कोटींची लूट, डिजिटल अटकेचीची भीती दाखवित आणखी 5 जाळ्यात
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला अरेस्ट केल्याचं सांगत सायबर भामटे तुमच्याकडून पैसे उकळतात. डिजिटल अरेस्ट म्हणजे एखादी व्यक्ती आपण पोलीस किंवा तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचं सांगून फोन करते. तुम्हाला ड्रग्स किंवा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याचं सांगितलं जातं. तुम्हाला सतत फोन करुन किंवा मेसेजेस पाठवून तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाल्याचं सांगण्यात येतं. या गुन्ह्यातून सुटका हवी असेल तर पैशाची मागणी केली जाते. बऱ्याच वेळेला व्हिडीओ कॉल करुन पोलीस स्टेशन असल्यासारखं भासवण्यात येतं. तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी दबाव टाकला जातो आणि तुमची फसवणूक केली जाते.
प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार नसतो. कुठल्याही तपास यंत्रणेला तुमच्या घरी तुम्हाला डिजिटली अटक करता येत नाही. हे सायबर भामटे काय सांगून तुम्हाला फोन करतात, किंवा कसल्या धमक्या देतात, त्यांची मोडस ऑपरेंडी म्हणजे काम करण्याची पद्धत कशी असते, ते जाणून घेऊया.
गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी कशी असते?
- तुमचा नंबर एका मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाशी संबंधित आढळलाय
- तुमच्या अकाऊण्टवरुन तुम्ही दहशतवाद्यांना मदत केल्याचं समजतंय
- तुमचं एक पार्सल आलंय, त्यामध्ये ड्र्ग्ज आहेत
- तुम्ही परदेशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये हत्यार सापडलंय
- तुम्ही केलेल्या गुन्ह्यांमुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल
- तुम्ही त्यांना सांगितलंत की मी असं काही केलेलं नाही, तरी ते म्हणतात तुमचा आधार कार्ड नंबर त्याच्यावर आहे, आणि तुम्हाला सायबर भामटे तुमचा आधार कार्ड नंबरही सांगतात
- या सगळ्यातून तुम्हाला सुटका हवी असेल, जामीन हवा तर पैसे भरा, नाही तर घरात येऊन तुम्हाला अटक करू
- आमचा व्हिडीओ कॉल कट केलात किंवा पोलिसांना कळवलं तर घरात येऊन अटक करू
सुशिक्षित कसे होतात डिजिटल अरेस्ट?
सुशिक्षितांना हे खरं कसं वाटतं. तर त्यासाठी हे सायबर भामटे तीन पातळ्यांवर काम करतात आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास बसतो. पहिलं म्हणजे, सायबर भामटे तुमची सगळी माहिती काढतात. म्हणजे मागच्या महिन्यात तुम्ही गोव्याला गेला होतात. तुमची मुलगी पुण्यात शिकते, तुम्ही गेल्या आठवड्यात नवं वॉशिंग मशीन घेतलंय. अशी तुमचीच माहिती हे भामटे तुम्हाला सांगतात. त्यामुळे तुम्हाला खरंच वाटायला लागतं की हे तपास अधिकारी आहेत. दुसरी पातळी म्हणजे आपण सीबीआय, पोलीस स्टेशन किंवा नार्कोटिक्समधून बोलतोय, असं सांगून व्हिडीओ कॉल केला जातो. व्हिडीओ कॉल करण्याआधी पोलीस स्टेशनसारखा किंवा सरकारी ऑफिससारखा सेटअप केला जातो. अगदी चित्रपटांच्या सेटलाही लाजवेल असा सेट उभारला जातो. तुमच्याशी बोलणारी माणसंसुद्धा पोलिसांचे कपडे घालून बसलेले असतात. आणि पोलिसांचे कपडे घालून बसलेले हे भामटे अगदी सराईतपणे तुमच्याशी बोलतात. बोलताना तुम्हाला धडाधड कायद्याची कलमं सांगतात. या सगळ्यामुळे काय होतं तर खरंच आपली चौकशी होतेय, असं तुम्हाला वाटतं आणि तुमचा विश्वास बसतो. आता तिसरी पातळी म्हणजे हे सायबर भामटे तुमच्यावर वेळेचा दबाव आणतात. म्हणजे आता लगेच निर्णय घ्या, लगेच पैसे भरा. नाही तर तुम्हाला घरात येऊन अटक करू असं सांगितलं जातं.
त्या वेळी नेमकं काय घडतं?
तुमची सगळी माहिती त्या भामट्यांकडे असणं याची भीती वाटते. तुम्हाला घरी येऊन अटक करतो असं सांगितल्यावर वाटणारी बदनामीची भीती निर्माण होते. या सगळ्याचा तुमच्या मानसिक स्थितीवर इतका वाईट परिणाम होतो की तुम्ही पैसे देऊन मोकळे होता. गेल्या वर्षी अशा डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये तब्बल १७७६ कोटींचं नुकसान झालं होतं. एकट्या पुण्याची आकडेवारी लक्षात घेतली तर पुण्यात डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून रोज एक कोटींच्या वर फसवणूक होते. मुंबईसारख्या शहरात हा आकडा बराच मोठा आहे. या डिजिटल अरेस्टला मुळीच बळी पडू नका, आणि तुमच्या कष्टाचा एकही पैसा सायबर भामट्यांना देऊ नका.
आपण काय लक्षात ठेवायचं?
डिजिटल अरेस्टला कायद्यात कुठलंही स्थान नाही. डिजिटल अरेस्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची अटक नसते, हा फक्त सायबर भामट्यांनी टाकलेला मानसिक दबाव असतो. कुठलीही तपास यंत्रणा म्हणजे पोलीस, सीबीआय, नार्कोटिक्स किंवा आणखी कुठलीही तपास यंत्रणा कधीही फोन करून, व्हिडीओ कॉल करन चौकशी करत नाही. कुठलीही सरकारी यंत्रणा किंवा सरकारी कार्यालय फोन किंवा व्हिडीओ कॉल करुन तुम्हाला कुठलेही प्रश्न विचारत नाही. कुठल्याही तपास यंत्रणा किंवा सरकारी यंत्रणा कधीही फोन करुन तुमच्याकडे पैशांची मागणी करत नाहीत.
तुम्हाला असा व्हिडीओ कॉल आला, तर काय करायचंं?
असा फोन आलाच तर आधी थांबा, विचार करा आणि मग कृती करा. अजिबात घाबरुन जाऊ नका आणि घाईघाईनं कुठलाही निर्णय घेऊ नका. तुमच्याबाबतीत असं घडलंच तर कुटुंबीयांशी आणि नातेवाईकांशी चर्चा करा. शक्य असल्यास त्या व्हिडीओ कॉलचा स्क्रीन शॉट घ्या किंवा रेकॉर्ड करा. त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा. 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईनवर फोन करुन तक्रार करा.
तुम्ही मेहनतीनं कमावलेला पैसा कुठल्याही परिस्थितीत सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून त्यांना देऊ नका. एकदा का पैसे गेले, की ते पुन्हा मिळवणं कठीण होऊन जातं. कारण हे सायबर भामटे कुठल्याही राज्यात, कुठल्याही देशातून अशा प्रकारचे काळे धंदे करत असतात. विशेषतः म्यॅनमार, लावोस, कंबोडिया या देशांमधून असे प्रकार केले जातात. मग अशा प्रकरणातल्या तक्रारींचं पुढे काय होतं, तर पोलीस त्यांच्या परीनं या तक्रारींचा तपास करतात. आतापर्यंत असे हजारो नंबर्स, सिम कार्डस आणि बँकखाती गोठवण्यात आली आहेत.