ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी:
Dharashiv Hotel Bhagyashree News: धाराशिवमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण करुन मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला होता. या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. मात्र आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला असून हा सर्व बनाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नागेश मडके हल्ला प्रकरणात नवा ट्वीस्ट
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण करून मारहाण करून फेकून दिल्याच्या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. पिस्तुलच्या परवानगीसाठी नागेश मडके यांच्याकडून हल्ल्याचा बनाव रचला जात आहे, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनीच असं म्हटल्याचे खुद्द हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी सांगितले आहे. याप्रकरणी हल्ला होऊन तिसरा दिवस उजाडला तरी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवत असल्याचा आरोप हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांनी केला आहे.
नागेश मडके यांना मारहाण झालेली नसून हा बंदूकीचा परवाना मिळवण्यासाठी कट रचला गेला आहे. स्वतः नागेश मडके यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र मी अशी कोणतीही बातमी दिली नाही माझ्यावर खरोखर हल्ला झाला. मी बेशुद्ध होतो. आम्ही अडाणी आहोत, बंदुकीची गरज नाही, आमच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत फक्त न्याय मागत आहोत, असे स्पष्टीकरण नागेश मडके यांनी दिले आहे.
दरम्यान, याबाबत आज जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन माहिती देणार आहे. याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास, आम्हाला न्याय न मिळाल्यास मी माझ्या लेकरा बाळांसह आत्मदहन करीन असा इशाराही नागेश मडके यांनी दिला आहे. त्यामुळे याप्रकरणात नेमके सत्य काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
Hotel Bhagyashree News: खळबळजनक! 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाचे अपहरण, बेदम मारलं अन् पुलावरुन फेकलं