मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर गावात पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं. गावाजवळ असलेल्या शेतातील झाडाला दोरी लावून गळफास घेऊन या दाम्पत्याने आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. भगवान जाधव आणि आशाबाई जाधव असं आयुष्य संपवणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे.
शिवापूर गावातील भगवान जाधव हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह एकत्र राहत होते. मुलांनी खूप शिकावं आणि मोठं व्हावं यासाठी दोन्ही मुलांना त्यांनी बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवले. संसार प्रपंच सुरळीत असताना 29 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घरापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या शेतातील उंबराच्या झाडावर दोघांनीही गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नक्की वाचा >> Amravati News: अमरावती हादरलं! दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीला 5 जणांनी अडवलं, जंगलात नेऊन केलं सर्वात भयंकर कृत्य
पती-पत्नीच्या टोकाच्या निर्णयामुळे दोन्ही मुले पोरकी
पती-पत्नीच्या या टोकाच्या निर्णयामुळे त्यांची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. भगवान जाधव व आशाबाई जाधव या दाम्पत्याने त्यांचं जीवन का संपवलं, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, हे दाम्पत्य मनमिळाऊ व परिश्रम करणारे पती-पत्नी होते.त्यामुळे त्यांच्यात कुठला वाद नव्हता.पण या कठोर निर्णयामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.आर्थिक ताण की कौटुंबिक अडचणी? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले असून या घटनेमागचं खरं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. त्यामुळे पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास केल्या जात आहे.