Lonavala News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारा लोहगड किल्ला. युनेस्कोकडून जागतिक वारसा लाभलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. परंतु आता केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे या ऐतिहासिक लोहगड किल्ल्याची बदनामी होत आहे. विंचू कडा याला आता सीया पॉईंट असं म्हटलं जात आहे. या चर्चा थांबवल्या जाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
लोहगडाबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याची भीती
प्रेमात आंधळे झालेल्या दोघा व्यक्तींनी सुनियोजितपणे केलेल्या गुन्ह्यामुळे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या आणि शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या लोहगड किल्ल्याची प्रतिमा मलीन होऊ नये, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे राज्यभरातील अनेकांच्या मनात लोहगड किल्ल्याबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. प्रत्यक्षात गुन्हा हा काही व्यक्तींनी केल्याचा आरोप असून त्याचा संबंध किल्ल्याच्या इतिहासाशी किंवा वारसाशी जोडणं योग्य नसल्याचं इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे. स्थानिक नागरिक, गाईड, आणि पर्यटकांनी विंचू कडा असाच उल्लेख करावा. राज्य सरकारकडून विंचू कड्यावर नाम फलक लावण्यात यावे. अशी मागणी शिवप्रेमी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सीया पॉइंट नव्हे हा विंचू कडा...
लोहगडावरील सर्वात मोठं आकर्षण हे येथील विंचू कड्याचं आहे. हा कडा विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून याला विंचू कडा म्हटलं जातं. हा कडा जमिनीपासून खूप उंचीवर आहे. याच्या दोन्ही बाजूला खोल दऱ्या आहेत. याशिवाय अत्यंत घनदाट जंगल आहे. या विंचू कड्याला सीया पॉइंट म्हटलं जात आहे. यावरुन स्थानिक आणि शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world