Dombivali Crime News : नळावर हात पाय धूत असताना एका महिलेचा सुरक्षा रक्षकासोबत वाद झाला. या वादानंतर महिलेच्या पतीने सुरक्षा रक्षकाची हत्या केली. उमेश वाघे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही धक्कादायक घटना डोंबिवली कोपर परिसरात घडली आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अक्षय जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. हत्येच्या या घटनेमुळं डोंबिवली शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपर येथील अण्णाभाऊ साठे नगरात राहणारा उमेश वाघे मंगळवारी सायंकाळी परिसरातील एका नळावर हात पाय धूत होता. त्याचदरम्यान एका महिलेने उमेशला आवाज दिला आणि ती महिला त्याच्यावर जोरात ओरडली. नळ सूरु करुन पाणी वाया का घालवतोस? असं महिलेनं उमेशला विचारलं. त्यानंतर उमेश आणि त्या महिलेत मोठा वाद निर्माण झाला. वाद संपल्यानंतर महिलेचा पती अक्षय जाधव त्याठिकाणी आला.परंतु, अक्षय जाधव याचा देखील उमेशसोबत वाद झाला.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील 'या' परिसरात लगीनघाई संकटात! तब्बल 10 हजार लग्न लांबणीवर? कारण वाचून सर्वच झाले थक्क
आरोपीने उमेशच्या डोक्यात लोखंडी सळई मारली अन्..
त्यानंतर रात्रीच्या वेळेस उमेश परिसरात सुरु असलेल्या रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी निघून गेला. त्याठिकाणी तो सुरक्षा रक्षकाचे काम करतो. रात्री 11 वाजताच्या सुमारास अक्षय हा उमेशच्या कामाच्या ठिकाणी पोहचला. त्याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला.हा वाद विकोपाला गेला. अक्षयने त्याठिकाणी असेलली लोखंडी सळई रागाच्या भरात उमेशच्या डोक्यात जोराने मारली. या घटनेत उमेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उमेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आरोपी अक्षय जाधवला अटक केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.