सोनम रघुवंशी प्रकरणात आता नवा अँगल समोर येत आहे. या अँगलने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोनमनं राजाचा नरबळी दिला आहे का? सोनमनं तिच्या वडिलांसाठी केली राजाची हत्या केली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोनम तंत्र-मंत्र करत असल्याचं ही समोर आलं आहे. त्यामुळे सोनम-राजा प्रकरणात आता नवा अँगल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी सोनम आणि तिच्या साथिदारांना पकडल्यानंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत. मुसळधार पावसात आणि धुक्यानं वेढलेल्या वेई साऊडोंगच्या जंगलात पोलीस सोनम, आकाश, विशाल आणि आनंदला घेऊन गेले होते. राजाची हत्या करण्यासाठी कोण कुठल्या मार्गानं आलं होतं. त्या तिघांची राजाशी ओळख कशी झाली. राजाची हत्या कशी झाली. राजाला कुठल्या पॉईंटवरुन खाली फेकलं. राजाला फेकल्यानंतर सोमन आणि तिघे जण कुठल्या मार्गानं निघून गेले. फक्त अठरा मिनिटांमध्ये राजाची हत्या कशी करण्यात आली, हे सगळं पोलिसांनी चौघांकडून जाणून घेतलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
23 मे ला दुपारी दोन ते दोन वाजून अठरा मिनिटं एवढ्याच वेळात या चौघांनी राजाचा खेळ खल्लास करुन टाकला. हे सगळं कसं घडलं ते रिक्रिएशन करत पोलिसांनी सविस्तर सांगितलं. सोनम आणि तिचे तीन साथीदार याआधी मेघालयात आले नव्हते. त्यांनी कुठल्याही ठिकाणांची रेकी केली नव्हती. राजाला एखाद्या निर्जन ठिकाणी मारुन टाकायचं, एवढाच त्यांचा प्लॅन होता. ज्यावेळी राजाची हत्या झाली, त्यावेळी सोनमचा प्रियकर राज कुशवाह त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. विशाल, आकाश आणि आनंद हे तिघेही डोंगर चढताना सोनम आणि राजाला भेटले. तिघांचीही राजाशी ओळख नव्हती. पण आपण मध्य प्रदेशातले असल्याचं तिघांनी राजाला सांगितलं. त्यानंतर राजा त्यांच्याशी बातचीत करू लागला.
वर जाताच आसपास कुणीही नसल्याचं सोनम आणि तिच्या साथीदारांनी हेरलं. याआधीही दोन वेळा राजाला मारण्याचा प्लॅन होता. पण आजूबाजूला लोक असल्यानं आणि राजाचा मृतदेह फेकून देण्यासाठी जागा न सापडल्यानं तो प्लॅन फसला. वेई साऊडोंगच्या डोंगरावर आजूबाजूला कुणीही नव्हतं. दरीत राजाचा मृतदेह फेकून देता येईल, याचा अंदाज आल्यानं चौघांनी इथेच राजाला मारायचं ठरवलं. सोनमनं तीनही आरोपींना राजाला मारण्यासाठी सिग्नल दिला. विशालनं राजाच्या डोक्यात मागच्या बाजूनं वार केला, तेव्हा सोनम राजाच्या समोरच होती. डोक्यात वार केल्यावर राजा ओरडू लागला. त्यामुळे सोनम तिथून निघून गेली. राजाच्या डोक्यावर विशालनं पुन्हा तीक्ष्ण हत्यारानं वार केला. त्यामध्ये राजाचा मृत्यू झाला. त्यानंतर आकाश, विशाल आणि आनंद या तिघांनी राजाचा मृतदेह उचलून दरीत फेकून दिला.
राजाची हत्या केल्यानंतर सोनमनं स्वतःचा फोन नष्ट करुन टाकला. सध्या पोलिसांना यामध्ये लव्ह ट्रँगलचाच अँगल दिसतोय. मात्र राजाच्या हत्येमागे काही आर्थिक कारण आहे का, आणखी कुठला अँगल आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. राजाची हत्या करणाऱ्या सोनमला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी राजाच्या कुटुंबीयांनी केलीय. सोनम लग्नाआधी राजाशी नीट वागायची नाही. मात्र सोनम राजाची हत्या करेल, असं कधीच वाटलं नसल्याचं राजाच्या मित्रानं सांगितलं. राजाशी लग्न ठरल्यानंतर सोनम राजाशी फोनवर जास्त बोलत नव्हती. बऱ्याच वेळा सोनम राजाचे फोनही उचलत नव्हती. कारण विचारल्यावर बिझनेसमध्ये बिझी होते, असं सोनम सांगायची. राजाशी लग्न झाल्यानंतर सोनम फक्त दोन दिवसच राजाच्या घरी राहिली. पण त्या दोन दिवसांतही सोनम क्राईम पेट्रोल बघत बसायची, असं राजाची आई सांगते. कामाख्या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय राजाच्या जवळ येणार नाही, असं सोनमनं ठरवलं होतं. सोनमच्या सगळ्या विचारांचा त्यावेळी राजाच्या कुटुंबीयांनी आदर केला. एवढंच नाही तर सोनम जे सांगेल, ते राजा ऐकायचा. आता सोनम तंत्र मंत्र करत होती, असा आरोप आता राजाच्या कुटुंबीयांनी केलाय. सोनमच्या सांगण्यानुसार राजानं घराच्या प्रवेशद्वारावर एक पोटली बांधली होती. घराला नजर लागू नये म्हणून सोनमनं राजाला ही पोटली बांधायला लावली होती.
सोनमनं राजाची हत्या केल्यानंतर आता राजाच्या कुटुंबीयांनी ही पोटली काढून टाकली आहे. लग्नानंतर सोनमनं कामाख्या देवीच्या दर्शनाला जाण्याचा आग्रह धरला. गुवाहाटीमध्येही सोनमनं तंत्र-मंत्र केल्याचा राजाच्या कुटुंबीयांना संशय आहे. ज्यावेळी सोनम आणि राजा गायब होते, त्यावेळी सोनमच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घरावर सोनमचा उलटा फोटो लावला होता. सोनमनं तिच्या वडिलांसाठी राजाचा नरबळी दिल्याचा आरोप राजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. सोनमच्या कुटुंबीयांचे मांत्रिकांशी संबंध असल्याचं राजाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. सोनमच्या वडिलांना दोन वेळा हार्ट अटॅक आला होता. आता तिच्या वडिलांची प्रकृती ठीक आहे. वडिलांची प्रकृती सुधारण्यासाठी सोनमनं राजाचा नरबळी दिल्याचाही आरोप राजाचे कुटुंबीय करत आहेत. सोनमचं राज कुशवाहवर प्रेम होतं, म्हणून तिला राजाशी लग्न करायचं नव्हतं. त्यासाठीच तिनं राजाला मारुन टाकलं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र आता तंत्र-मंत्र, नरबळी या अँगलनंही पोलीस सोनमची चौकशी करणार आहेत. त्यानंतर या प्रकरणातली बरीच रहस्यं समोर येण्याची शक्यता आहे.