- म्हैसूरच्या हुंडी गावात लग्नाच्या दोन दिवस आधी नवरी, आई-वडिलांनी सामूहिक आत्महत्या केली
- नवरी रक्षिताचा एकतर्फी प्रेम करणाऱ्या उल्लास गौडाने कुटुंबाला त्रास दिल्याने मानसिक ताण वाढला होता
- रक्षिताच्या होणाऱ्या नवऱ्याला खोट्या माहिती व फोटो पाठवून उल्लासने लग्नात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला
Mysore News: एका 21 वर्षाच्या तरुणीचं लग्न ठरलं होतं. घरातले सर्व आनंदी होती. नवरी मुलीचे वडील आई लग्न कार्यात गुंतले होते. लग्नाला फक्त दोन दिवसच शिल्लक होते. काही तासांनी लेकीच्या डोक्यावर अक्षता पडणार म्हणून आई वडील सुखावले होते. पण या सर्व गोष्टीला कुणाची तरी नजर लागली. लग्न घरात नको तेच झाले. ज्या घरातून लेकीची वरात निघणार होती त्याच घरातून लेकीसह आई वडीलांची अंत्ययात्रा निघाली. या घटनेनं संपूर्ण गाव हळहळलं आहे. या तिघांनी ही लग्न लागण्या आधीच आत्महत्या केल्या. या मागचे कारण ज्यावेळी समोर आले त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला. मरणा आधी एक सुसाईड नोट त्यांनी लिहीली होती. त्यावरून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.
ही मन सुन्न करणारी घटना कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील हालेकेम्पय्यन हुंडी गावात लग्नाच्या अवघ्या 2 दिवस आधी नववधू आणि तिच्या आई-वडिलांनी सामूहिक आत्महत्या केली. घरात सनई-चौघडे वाजण्यापूर्वीच संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यात शिवन्ना, त्यांची पत्नी नागरत्ना (45) आणि 21 वर्षांची मुलगी रक्षिता यांनी आपले जिवन संपवले आहे. या तिघांनी जेवणात विष कालवून आपली जिवन संपवले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली आहे.
रक्षिताचे लग्न ठरले होते. लग्नाची लगबग सुरू होती. संपूर्ण कुटुंब त्यासाठी कामाला लागलं होतं. मात्र त्याच वेळी गावाती उल्लास गौडा नावाचा युवक रक्षिताशी लग्न करण्यास इच्छुक होता. त्याचं तिच्या सोबत एकतर्फी प्रेम होतं. तिचं लग्न ठरलं आहे हे त्याला सहन होत नव्हतं. त्यातूनच त्याने रक्षिताच्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरूवात केली. त्यातून हे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावात होतं. तो ऐवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने रक्षिताच्या होणाऱ्या नवऱ्याला ही तिच्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या. काही फोटो आणि मेसेज ही पाठवले.
या घटनेमुळे रक्षिताचे कुटुंब हादरून गेले होते. यामुळे आपली समाजात बदनामी होईल. शिवाय लग्न ही तुटेल अशी भिती त्यांना सतावत होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे. या घटनेची माहिती मिळताच टी. नरसीपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. त्यात थेट उल्लास गौडा याला या आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुसाईड नोट, मोबाईल चॅट्स आणि कॉल डिटेल्सच्या आधारे फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.