Nagpur News: चुकीची वागणूक करतो या कारणावरून आई-वडिलांनी आपल्या 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला हातपाय साखळी- कुलूप घालून बांधून ठेवले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तत्काळ हस्तक्षेप करत मुलाची सुटका केली.
आई वडिलांनीच मुलाला बांधून ठेवलं..
गैरवर्तणूक सुधारण्यासाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांनी 12 वर्षांच्या मुलाला साखळदंडाने बांधल्याची धक्कादायक घटना दक्षिण नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. मुलगा खूप खोडकर झाला होता, तो कोणाचेही ऐकत नव्हता आणि सतत घर सोडून बाहेर पळून जात होता आणि अन्यत्र लोकांचे मोबाईल फोन चोरून आणत होता. त्याचे हे "गैरवर्तन" थांबवण्यासाठी आणि त्याला घरातच ठेवण्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दोन महिन्यांपासून ते त्याला असे घरीच कोंडून कामावर जात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा अवघ्या 12 वर्षांचा आहे. जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाच्या पथकाने त्याच्या घरी धडक दिली तेव्हा त्याच्या पायाला लोखंडी साखळदंड आणि कुलूप लावून त्याला घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या हातापायाला जखमा देखील झाल्याचे दिसून आले आहे. सदर प्रकार बालहक्कांचे गंभीर उल्लंघन करणारा असून, मुलाला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चाईल्ड हेल्पलाइनवर मिळाली तक्रार
बाल संरक्षण कक्षाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली असता, मुलगा भयभीत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मुलाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात पालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. चाईल्ड हेल्पलाइन 1098 वर माहिती प्राप्त होताच सदर प्रकार हे फार गंभीर असल्याचे दिसून आल्यावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या अध्यक्षते खाली बाल संरक्षण पथक गठीत करण्यात आले. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी साधना हटवार, कायदा व परीविक्षा अधिकारी सुजाता गुल्हाने, चाईल्ड लाईन प्रतिनिधी मंगला टेंभुर्णे यांनी कारवाई केली आहे.
Navi Mumbai Crime News: सोशल मीडियाच्या नावाखाली खंडणीचे रॅकेट, बोगस पत्रकाराला अटक
याबाबत वैद्यकीय तपासणी करून मुलाला बालगृहात दाखल करण्यात आले असून पुढील कारवाईसाठी बाल कल्याण समिती समक्ष हजर केली जाणार आहेत. पोलीस बाल न्याय अधिनियम ,२०१५ व संबंधित कलमान्वये पुढील तपास करत आहेत. तसेच मुलाच्या वैद्यकीय तपासणीसह समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुलाने शाळा सोडली असून तो वस्तीत लोकांना त्रास देत असे आणि लोकांचे मोबाईल फोन चोरून आणत असे, अशा तक्रारी ऐकायला मिळाल्या आहेत.