Nagpur News : नागपुरात रविवारी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडल्यानंतर काही वेळात त्याच परिसरात एक हत्येची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दहा रुपयांच्या वादावरून ही हत्या घडल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी उत्तर नागपूरच्या नारी भागात पी एम आवास योजनेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर तिथे चाकू हल्ल्याची ही भीषण घटना घडली. व्हिआयपी मुव्हमेंट असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त असताना, कार्यक्रमाच्या काही काळानंतर अशी घटना घडल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली.
क्षुल्लक कारणावरुन एकाची हत्या...
एका चहा विक्रेत्याने एक इसमाची फक्त दहा रुपयांच्या चहाच्या वादावरून चाकूने वार करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. 45 वर्षीय मनोज विश्वनाथ यादव असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. तर न्यू म्हाडा कॉलनी येथील रहिवासी असलेला आणि चहा विक्री तसेच पानटपरी चालविणाऱ्या 42 वर्षीय आरोपी कैलास लालचंद्र गणवीर याने दुधाची प्लास्टिक पिशवी उघडण्यासाठी ठेवलेल्या चाकूने त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृतक मनोज यादव याने चहाचे थकित दहा रुपये न दिल्याने चहा विक्रेत्या कैलास सोबत त्याचा वाद झाला. त्यावेळी मनोज यादव याने चहा विक्रेत्या कैलास गणवीर याला झापड मारली. त्यावर कैलाशने मनोज याच्या मानेवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मनोजचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी कैलास याला घटनास्थळावरून अटक केली आहे.
कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीतला कार्यक्रम पार पडल्यानंतर काही काळानंतर अशी घटना घडल्याने खळबळ उडाली.