- CM देवेंद्र फडणवीस यांची नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा बारीक नजर
- पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून तपासात महत्त्वाच्या सूचना दिल्या
- पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले
- अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी
Pune Nasrapur News: नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातले आहे. या प्रकरणाचा तपास, गोळा केलेले पुरावे आणि तपासातील प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबींवर मुख्यमंत्री फडणवीस बारीक नजर ठेवून आहेत. त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाने राज्याचे राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आल्याने आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गाईचे वासरू पाहण्यासाठी गेली अन्...
दुसरीकडे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी वडिलांनी आपल्या मुलीच्या आवडीबाबत सांगताना आठवण सांगितली. पीडित चिमुरडीला गाय आणि वासरू खूप आवडायचे. दोन दिवसांपूर्वीच एका गाईला वासरू झाले होते, तेच पाहण्यासाठी ती गोठ्याकडे गेली होती आणि तिथेच नराधम भीमराव कांबळेने तिच्यावर झडप घातली. एका निष्पाप चिमुकलीचा असा करुण अंत होईल, अशी कल्पनाही कुटुंबाने केली नव्हती.
पोलीस आयुक्तांकडून कुटुंबाला धीर
"आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," अशा शब्दांत अमितेश कुमार यांनी पीडितेच्या आई-वडिलांना धीर दिला. तसेच तपासाबाबत काहीही सांगायचे असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
(नक्की वाचा : POCSO Case:...तर ते लैंगिक शोषणच, छत्रपती संभाजीनगरची गंभीर घटना! 13 वर्षांच्या पीडितेबाबत हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय)
ग्रामस्थांचा संताप; आरोपीला फाशीची मागणीदुसरीकडे आरोपी भीमराव कांबळे याच्या साळवडे गावातील नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलिसांना निवेदन दिले आहे. भीमराव कांबळेने संपूर्ण गावाची मान खाली घातली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.