राजलक्ष्मी कर यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की ज्या अनाथ आणि बेघर मुलीला त्यांनी रस्त्याच्या कडेला उचलून छातीशी धरले, स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवले, तीच मोठी झाल्यावर त्यांचा जीव घेईल. माणुसकी, नातेसंबंध आणि चांगुलपणावरील विश्वास उडावा इतका धक्कादायक हा सर्व प्रकार आहे. आरोपी मुलगी अल्पवयीन असून ती आठवीमध्ये शिकतीय. तिने तिच्या दोन मित्रांच्या मदतीनं तिला नवं आयुष्य देणाऱ्या आईच्या हत्येचा कट रचला.
ओडिशातील पारलाखेमुंडीमधील हे प्रकरण आहे. एका तीन दिवसांच्या मुलीला कोणीतरी रस्त्यावर सोडून गेले होते. राजलक्ष्मी यांनी या मुलीला उचलले आणि आपल्या मुलीप्रमाणे तिचे पालनपोषण केले, पण जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा तिने दोन मित्रांच्या मदतीने आपल्या याच आईची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने तिच्या दोन पुरुष मित्रांच्या मदतीने 29 एप्रिल रोजी राजलक्ष्मी कर (वय 54) यांची हत्या करण्याचा कट रचला. हत्येचा उद्देश राजलक्ष्मी यांचा आपल्या मुलीच्या दोन मुलांसोबत असलेल्या संबंधांना विरोध करणे आणि तिची मालमत्ता हडपणे हा होता.
काय होती आईच्या हत्येची योजना?
मुलीने कथितरित्या राजलक्ष्मी यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर उशीने त्यांचे तोंड दाबले. त्यानंतर राजलक्ष्मी यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, भुवनेश्वरमध्ये तिच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असं सांगण्यात आलं होतं. मुलीच्या योजनेनुसार सर्व काही ठीक चालले होते. राजलक्ष्मी यांना हृदयविकाराचा झटका आला नाही, तर त्यांची हत्या झाली आहे, असा संशय कोणालाही आला नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसा झाला उलगडा?
राजलक्ष्मी यांच्या हत्येला 15 दिवस उलटून गेले होते. तोपर्यंत मुलीवर कुणालाही संशय आला नाही. दरम्यान, राजलक्ष्मी यांचे भाऊ सिबा प्रसाद मिश्रा यांना मुलीचा मोबाईल फोन मिळाला. हा फोन भुवनेश्वरमध्येच राहिला होता. या मोबाईलची तपासणी केल्यावर इंस्टाग्रामवरील संभाषणातून हत्येच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळाली.
चॅटमध्ये राजलक्ष्मी यांची हत्या आणि त्यांचे सोन्याचे दागिने व रोकड ताब्यात घेण्याची विशेष योजना आखण्यात आली होती. हा खुलासा झाल्यानंतर मिश्रा यांनी 14 मे रोजी परलाखेमुंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर केलेल्या तपासात तीन आरोपी, अल्पवयीन मुलगी, मंदिराचा पुजारी गणेश रथ (21) आणि त्याचा मित्र दिनेश साहू (20) यांना अटक करण्यात आली. हे दोघंही त्याच शहरातील रहिवाशी आहेत.
( नक्की वाचा : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार )
आई-मुलीच्या मध्ये कोण आले?
गजपतीचे पोलीस अधीक्षक (एसपी) जतिंद्र कुमार पांडा यांनी माहितीनुसार, राजलक्ष्मी आणि त्यांच्या पतीला सुमारे 14 वर्षांपूर्वी भुवनेश्वरमध्ये रस्त्याच्या कडेला एक नवजात मुलगी सापडली होती. या दाम्पत्याला मुलबाळ नव्हते. त्यांनी त्या मुलीला आपल्याजवळ ठेवले आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे तिचे पालनपोषण केले.
राजलक्ष्मी यांच्या पतीचे एका वर्षानंतर निधन झाले. तेव्हापासून त्यांनी एकट्यानेच मुलीचे संगोपन केले. काही वर्षांपूर्वी, त्यांनी मुलीला केंद्रीय विद्यालयात शिकवण्यासाठी परलाखेमुंडी येथे स्थलांतर केले. तेथील शाळेत नाव घातले. तिला कोणताही त्रास होऊ नये म्हमून शहरात एक घर भाड्याने घेतले. त्याच वेळी मुलीचे रथ आणि साहू यांच्याशी संबंध निर्माण झाले. हे दोघंही तिच्यापेक्षा वयानं बरीच मोठी होती. राजलक्ष्मी यांनी कथितरित्या या संबंधावर आक्षेप घेतला, ज्यामुळे त्यांच्यात आणि मुलीमध्ये तणाव निर्माण झाला.
खोटी कहाणी रचली
पोलिसांच्या माहितीनुसार, रथने कथितरित्या मुलीला हत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. राजलक्ष्मी यांच्या हत्या केली तर कुणाच्याही विरोधाशिवाय आपले संबंध सुरु राहू शकतात. तसंच आपण त्यांची मालमत्ता देखील ताब्यात घेऊ शकू, अशी रथनं तिला खात्री दिली.
29 एप्रिल रोजी संध्याकाळी मुलीने कथितरित्या तिच्या आईला झोपेच्या गोळ्या दिल्या. राजलक्ष्मी बेशुद्ध झाल्यानंतर त तिने रथ आणि साहू यांना बोलावले. तिघांनी मिळून कथितरित्या उशीने राजलक्ष्मी यांचा गळा दाबून खून केला. पीडितेला हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. आरोपींनी कुटुंबातील सदस्य आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सांगितले की तिला हृदयविकाराचा झटका आला होता. राजलक्ष्मी यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास होता, त्यामुळे त्यांच्या दाव्यावर कोणीही प्रश्न विचारला नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीने यापूर्वी राजलक्ष्मी यांचे काही सोन्याचे दागिने रथला दिले होते. त्याने कथितरित्या ते सुमारे 2.4 लाख रुपयांना गहाण ठेवले होते. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 30 ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन उशी जप्त केल्या आहेत.