- पुणे जिल्ह्यातील आळेखिंड भागात वडिलांनी दोन लहान मुलांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला
- साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून पाच वर्षाचा मुलगा वाचला आहे
- मुलगा आर्यनच्या धैर्यामुळे स्थानिकांनी त्याला पोलिसांकडे पोहोचवले आणि त्याने संपूर्ण घटनेची माहिती दिली
अविनाश पवार
माणुसकीला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेखिंड परिसरात उघडकीस आली आहे. पोटच्या दोन लहान मुलांचा वडिलांनीच गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. या क्रूर कृत्यात साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण 5 वर्षांचा मुलगा मृत्यूच्या दारातून सुदैवाने बचावला आहे. आळेफाटा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी बाप सागर सदाशिव शिंदे याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला वाटले दोन्ही मुलं मेली म्हणून त्यांचे मृतदेह जंगलात टाकून तो निघाला. पण मुलगी मेली होती. मुलगा हा जिवंतच होता हे त्याला समजलेच नाही.
नेमकी घटना काय?
आरोपी सागर शिंदे याच पत्नी त्याला सोडून गेली आहे. दोन मुलं त्याला आहेत. त्यात एक मुलगी आणि एक मुलगा आहे. ते दोघे ही त्याच्याकडेच राहातात. मंगळवारी सकाळी तो आपल्या दोन्ही मुलांना 'फिरायला नेतो' असे सांगून घरातून बाहेर पडला. पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना त्याने आळेखिंड येथील निर्जन जंगल परिसरात गाडी थांबवली. तिथे त्याने हर्षदा वय साडेतीन वर्ष आणि आर्यन वय पाच वर्ष या दोघांचाही गळा आवळून त्यांना जंगलात फेकून दिले . त्यानंतर तो तिथून पळून गेला.
मुलाच्या जिद्दीमुळे फुटला वाचा
बुधवारी सकाळी 5 वर्षांचा आर्यन शुद्धीवर आला. जखमी अवस्थेत तो रडत रडत रस्त्यावर आला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या नजरेस तो पडला. ग्रामस्थांनी त्याची विचापूस केली. त्यानंतर तातडीने आळेफाटा पोलिसांना पाचारण केले. आर्यनकडे पोलीसांनी चौकशी केली. त्याने झालेला सर्व घटनाक्रम पोलीसांना सांगितला. वडीलांना आपल्याला बाहेर आणल्याचं त्याने सांगितलं. पण त्याची छोटी बहिणी त्याच्या सोबत नव्हती. ती कुठे आहे याचा शोध पोलीसांनी सुरू केला. शिवाय त्यांच्या बापाचा ही शोध पोलीस घेत होते. आर्यनने दाखवलेल्या धैर्यामुळे पोलिसांनी मोशी येथील पत्ता शोधून काढला.
नराधम बापाला अटक
पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी हा चाकण परिसरात असल्याचं शोधून काढलं. तो एका टपरीवर निवांत बसला होता. त्याला कसला ही पश्चाताप नव्हता. तिथून त्याला पोलीसांनी ताब्यात घेतला. पुढे त्याची चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. आपण दोन्ही मुलांना ठार केलं असल्याचं त्याने सांगितलं. त्याला आपला मुलगा जिवंत आहे हे ही माहित नव्हतं. मुलीला कुठे मारलं आहे हे त्याने सांगितलं. पोलीस घटनास्थळी गेले. तिथून तिन वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आळे फाटा पोलीसांनी काही तासात या केसचा छडा लावला.