- पुणे रेल्वे स्थानक परिसरातील श्री दत्त मंदिराजवळ एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले
- मुलगी तिच्या आईवडिलांसोबत झोपेत असताना चोरट्यांनी तिचे अपहरण केले
- गुन्हे शाखेने ६५ ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासून महिला आणि दोन साथीदारांना ताब्यात घेतले
अजिंक्य धायगुडे पाटील
एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात श्री दत्त मंदिर आहे. या मंदिराच्या मोकळ्या जागेत या चिमुकलीसह तिचे आई वडील आराम करत होते. त्याच वेळी त्यांचा डोळा लागला. याचाच गैरफायदा घेत त्या लहान मुलीला चोरट्यांनी पळवले. ज्यावेळी मुलीच्या आई-वडीलांचा डोळा उघडला त्यावेळी ते बाळ तिथे नव्हते. ते पाहून त्यांच्या पाया खालची वाळू सरकली. काय करावे हे त्यांना समजले नाही. ते पुर्णपणे घाबरले होते. त्यांनी तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली.
ही घटना 30 मे रोजी घडली. पुणे स्टेशन परिसरात श्री दत्त मंदिरामोरील मोकळ्या जागेत मुलीसह तिचे आईवडील झोपले होते. झोपेत असतानाच चोरांनी त्या लहान मुलीची चोरी केली. त्यानंत ते तिथून पसार झाले. ही बाब त्या मुलीच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर गुन्हे शाखेने एक पथक तयार केले. तातडीने लहान मुलीचा शोध सुरू झाला. सर्वात आधी सीसीटीव्ही फुटेज चेक केले गेले. पोलीसांनी पुणे स्टेशन परिसरातील 65 ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात त्यांना एक मोठा लिड मिळाला. तोच या केसचा टर्निंग पॉईंट ठरला.
सीसीटीव्हीमध्ये एक महिला आणि तिच्याबरोबर असलेले दोन साथीदार फलाट क्रमांक चार परिसरातून पनवेल-नांदेड रेल्वेतून जाताना दिसले. त्यांच्या सोबत ती लहान मुलगी ही दिसत होती. पोलीसांनी हे चोरटे पुढे जाण्या आधीच सापळा रचला. गुन्हे शाखेच्या पथकाने बालिकेचे अपहरण करणाऱ्या एका महिलेसह तिघांना दौंड रेल्वे स्थानक ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात बालिकेचे अपहरण केल्यानंतर तिची विक्री करण्यात येणार होती, अशी माहिती आरोपींनी चौकशीत पोलिसांना दिली. पोलीसांनी ज्या वेगाने सुत्र हलवली त्यामुळे ही चिमुकली तिच्या आई वडीलांकडे पुन्हा जावू शकली. बंड गार्डन पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.
पुण्यात अलिकडच्या काळात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. त्यात या चिमुकल्या मुलीचे अपहरणाची बातमी आल्याने सगळेच जण हादरले आहे. शिवाय चौकशीत जे सत्य समोर आले आहे त्याने तर खळबळ उडाली आहे. या चिमुकलीची विक्री केली जाणार होती हे आरोपींनी कबूल केले आहे. पोलीसांनी केलेल्या कामगिरी मुळे त्यांचा हा डाव उधळला गेला आहे. शिवाय आरोपींनी पोलीसांनी जेरबंद ही केले आहे.