
Raja Raghuvanshi Murder Case : 'मी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहे... माझी बहीण गुन्हेगार आहे... मी स्वतः सोनमविरुद्ध खटला लढेन...' पतीच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या सोनमचा (Sonam Raghuvanshi ) भाऊ गोविंद जेव्हा राजाच्या घरी पोहोचला, तेव्हा वातावरण भावूक झाले. गोविंद राजाची आई उमा रघुवंशी यांना मिठी मारून ढसाढसा रडू लागला. त्याने त्यांचे पाय धरले. सोनमचा भाऊ गोविंदने राजाच्या आईला सांगितले की तो या प्रकरणात त्यांच्या कुटुंबाला पूर्ण साथ देईल. त्याने सोनमविरुद्ध स्वतः खटला लढवण्यास तयार असल्याचा निर्धारही गोविंदनं व्यक्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोनमकडून गुन्हा कबूल
पोलिसांच्या सूत्रांनुसार, शिलाँगला नेण्यात आलेल्या सोनमने गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या इतर चार आरोपींनाही शिलॉंगला नेले आहे. त्यांच्याकडून राजा हत्याकांडातील प्रत्येक रहस्य जाणून घेतले जात आहे. पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावेही मिळाले आहेत. यात रक्ताने माखलेला रेनकोट आणि टी-शर्टचा समावेश आहे. तसेच, शिलॉंगच्या डोंगरावर राजाची ज्या खुखरीने हत्या करण्यात आली होती, ती खुखरीही जप्त करण्यात आली आहे.
सोनमचा भाऊ गोविंदने राजाच्या कुटुंबासोबत माध्यमांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. सोनमच्या भावाने सांगितले की राज माझा खूप लाडका होता. सोनमने जे काही नियोजन केले, ते मला तुमच्याकडून म्हणजेच मीडियाकडून कळले. राज नेहमी सोनमला दीदी म्हणायचा. माझ्या घरी बसून त्याने सोनमकडून राखी बांधून घेतली होती. मी राजाच्या आईची माफी मागितली आहे. सोनम गुन्हेगार असेल, तर तिला शिक्षा मिळालीच पाहिजे.
( नक्की वाचा : Raja Raghuvanshi Murder : राजाच्या हत्येनंतर सोनमनं 17 दिवस काय केलं? वाचा Inside Story )
राजा रघुवंशीच्या आईने काय सांगितले?
सोनमचा भाऊ गोविंदने भेट घेतल्यानंतर, राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी सांगितले की, गोविंद म्हणाला की सोनमला फाशी द्यावी. त्याला राजाबद्दल दुःख आहे, सोनमबद्दल नाही. गोविंदची काहीही चूक नाही. मी गोविंदला विचारले की तो सोनमला भेटला होता का. त्याने सांगितले की तो तिला तीन मिनिटे भेटला होता. मी त्याला विचारले की त्याने तिला का मारले नाही? तो म्हणाला की त्याला संधी मिळाली नाही कारण तिथे मीडिया आणि पोलिस होते.
सोनमनेच रचला होता कट!
इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीने 11 मे 2025 रोजी मोठ्या थाटामाटात सोनमशी लग्न केले होते. लग्नानंतर लगेचच त्याला ठार मारण्याचा कट तयार झाला होता. त्याची नवविवाहित पत्नी सोनमनेच राज कुशवाहासोबत मिळून हा कट रचला होता. या कटानुसार हे जोडपे शिलाँगला पोहोचले होते. 21 मे रोजी शिलाँगला पोहोचल्यानंतर या जोडप्याने 22 मे रोजी चेरापुंजीमध्ये जाऊन एक होमस्टे घेतला. या जोडप्यासोबतच हत्याकांडात सहभागी असलेले इतर आरोपीही तिथे होमस्टेमध्ये थांबले होते. पण, याची राजा रघुवंशीला अजिबात कल्पना नव्हती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world