Mumbai Sathaye College : मुंबईतील विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून नालासोपारा येथील संध्या पाठक या 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रात्री उशीरा संध्याचे पार्थिव नालासोपारा येथे आणले त्यावेळी कुटुंबीय आणि परिसरातल्या रहिवाशांनी एकच आक्रोश केला होता. संध्याच्या कुटुंबीयांनी संध्या (Sandhya Pathak) आत्महत्या करुच शकत नाही. ती मानसिकदृष्ट्या स्थिर असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्याही दबावात नसलेली संध्या आत्महत्या का करेल? तिला आत्महत्या करायचीच असती तर तिने घरीच स्वत:चं बरं वाईट केलं असतं किंवा ट्रेनमधून उडी मारली असती. ती कॉलेजमध्ये जाऊन असं का करेल..? असे अनेक प्रश्न तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत. तिला कोणी तरी धक्का दिला असेल. त्यामुळे संध्याची आत्महत्या नसून कुटुंबीयांनी तिच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
नक्की वाचा - Crime News: दोघांवर अत्याचाराचे आरोप, पण भलतेच सत्य समोर, महिलेलाच झाली 7 वर्षांची शिक्षा
गुरुवारी सकाळी संध्या (Sandhya Pathak killed ?) नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आली होती. मात्र सकाळी सव्वा सातच्या सुमारास तिने तिसर्या मजल्यावरून उडी मारल्याचं सांगण्यात आलं. संध्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना कळवल्याचा आरोप कॉलेज प्रशासनावर करण्यात आला आहे. संध्या कॉलेजच्या आवारात फिरताना दिसत होती. तिचा वर्ग तळमजल्यावर असताना ती वर्गात न येता तिसऱ्या मजल्यावर कशी पोहोचली? असे विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय तिच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून तिला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संध्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.