मुलगी नकोय ही बुरसटेली मानसिकतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुलगी जन्मला आली म्हणून बीडच्या माहेरवासिनीला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून ठेवण्यात आलं. शिवाय तिचा छळ ही करण्यात आला. ही घटना सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या पुण्यात घडली आहे. त्यामुळ एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसात पुण्यात अशी काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे पुण्यात नेमकं चाललं तरी काय आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवानी चंदनशिवे. ही मुळची बीडची रहिवाशी. शिवानीचा विवाह पुण्यातील पिंपळा सौदागर येथील आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या निहाल चंदनशिवे याच्यासोबत मोठ्या धूमधडाक्यात झाला. लग्नाचे काही वर्ष चांगले गेले. यादरम्यान शिवानी गर्भवती राहिली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. तिथूनच खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्याला ग्रहण लागले. मुलगी जन्मला का घातली म्हणून पतीसह सासू - सासरा आणि दिराने मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. शिवानीला एका खोलीत उपाशीपोटी डांबून ठेवण्यात आले.
मृत्यूची दरी समोर दिसत असताना एका दिवशी घरी कोणीही नसल्याचे पाहून कडी कोयंडा तोडून शिवानीने पुण्यातून पळ काढला. तीने थेट बीड गाठले. आई वडिलांच्या सोबतीने तिने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून सासरच्या क्रूर विकृतीचा पाढा वाचला. आपला पती सासू सासरा, दिर यांनी हे कृत्य केल्याचं पिडीतेचा आरोप आहे. याच लोकांनी पुण्याच्या संस्कृतीला बट्टा लावला आहे असा आरोप होत आहे. मुलीवर झालेला क्रूर छळ पाहून शिवानीचे कुटुंब देखील पुरतेच हादरून गेले आहे. मुलगी झाली म्हणून मुलीचे हालहाल करत जाच केला. या क्रूर असलेल्या माणसांमधील राक्षसी वृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवानीच्या आईने केली आहे.
या प्रकरणी बीड पोलिसांनी पती निहाल चंदनशिवे, सासू निर्मला, सासरे अरुण चांदशिवेसह दीरावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सर्वच आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. शिवानीची आप बीती ऐकल्यानंतर बीड पोलिस देखील चक्रावून गेले होते. शिवानीसोबत घडलेल्या क्रूर अत्याचार प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी देखील मदतीचा हात देत शेवटपर्यंत या प्रकरणात आम्ही साथ देण्याचा दावा पोलिसांनी केलाय.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राला मान खाली घालवणारे ठरले. अशात आता मुलगी झाली म्हणून विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आला. या घटनेने सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्याला आणखीन एक कलंक लागला आहे. मुलगी नकोय म्हणून समाजातील बुरसटलेल्या विकृत चंदनशिवे कुटुंबाला पोलिस बेड्या कधी ठोकतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.