सुनील दवंगे, प्रतिनिधी
Akash Dubaiya Murder Case : श्रीरामपूर शहरात हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर संतप्त नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गेल्या एक तासापासून नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हत्या झालेल्या आकाश दुबैया यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला आहे. जोपर्यंत आरोपींवर कठोर आणि तातडीची कारवाई होत नाही,तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही,असा ठाम पवित्रा नातेवाईक आणि नागरिकांनी घेतला आहे.
पोलीस ठाणे परिसरात मोठा तणाव
त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून,मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली आहे. संतप्त नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.शहरात वारंवार घडणाऱ्या खुनाच्या घटना, हल्ले आणि गंभीर गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नक्की वाचा >> Nandurbar News: नंदूरबारमध्ये खळबळ! 'या' शासकीय वसतिगृहात 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, तिघांची प्रकृती चिंताजनक
...तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही
पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.सध्या पोलीस अधिकारी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मात्र,आरोपींवर ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.