Ulhasnagar News : उल्हासनगरमधील गुन्हेगारीच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. पुन्हा एकदा उल्हासनगरमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. उल्हासनगर कॅम्प ५ मधील कैलाश कॉलनी परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली.
जुन्या वादातून गोळीबार, दोघांचा मृत्यू
उल्हासनगरमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अंबरनाथ गाव आणि कैलाश कॉलनी चौकातील गुंडांमधील जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा मृत्यू झाला आहे. अर्जुन सुरजबली चौहान हा या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेचा एक सीसीटीव्हीदेखील समोर आला आहे. त्यानुसार, रस्त्यावर दोन गटात वाद सुरू होता. त्यावेळी मोठ्या संख्येने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्याने गोळीबार झाला. पुढल्या काही क्षणात लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. यानंतर एका व्यक्तीला मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयत आणि जखमींना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र जखमी अर्जुन चौहान याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुया ग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.