
मनोज सातवी
विरार पश्चिमेच्या अर्नाळा किल्ल्याजवळील समुद्रकिनारी दोन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. पोलिसांना या बाबतची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा ही केला. मात्र पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पूरावा भेटला नाही. त्यामुळे या हत्या आहेत की आत्महत्या याबाबतचे गुढ मात्र वाढले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्या पती पत्नीचे मृतदेह सापडले आहे त्यांची ओळख पटली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शिवाजी शिंदे यांचे वय 54 वर्ष आहे. तर त्यांची पत्नी रंजीता शिंदे त्यांचे वय 48 वर्षे आहे. अशी या दोघांची ओळख पटली आहे. दोघेही पती-पत्नी असून ते विरार पूर्वेतील रहिवासी असल्याचं ही समोर आले आहे. मात्र हे दोघे अर्नाळ्या किल्ल्यात कशासाठी आले होते हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत.
त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र मृत महिलेच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे पतीने अगोदर पत्नीची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शिवाय घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्यात आणखी काही मिळते का याचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अर्नाळा किल्ला येथील ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बोटीतून बाहेर आणले गेले. त्यानंतर ते अर्नाळा किनाऱ्यावर ठेवण्यात आले होते. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे या मृत्यूमागचं नेमकं कारण काय, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. अर्नाळा पोलिसांकडून सर्व शक्य त्या बाजूंनी तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world