मनोज सातवी
एकीकडे सगळीकडे होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. होळी दहन अनेक ठिकाणी केले गेले. तर दुसऱ्या दिवशी धुळवट खेळली गेली. त्यामुळे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण सगळीकडे होतं. पण वसई जवळील भिणार गावातलं चित्र मात्र थोडं वेगळं होतं. या गावावर ऐन सणाच्या दिवशी शोककळा पसरली होती. त्याला कारण ही तसचं होतं. गावात राहाणारे तरुण मामा आणि भाच्याचा अपघातात मृत्यू झाला होता. तो ही होळीच्या दिवशी, त्यामुळे संपुर्ण गाव दुख:त होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रल्हाद माळी याचं वय 25 वर्ष होतं. तर मनोज जोगारी याचं वय 20 वर्ष होतं. हे दोघे तरुण नात्याने मामा भाचे होते. दोघेही भिणार या गावचे रहिवाशी होते. होळी दहन करून घरी येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात हे मामा भाचे जागीच ठार झाले. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भारोळ येथे हा अपघात झाला. प्रल्हाद आणि मनोज हे दोघेही भिणार गावचेच रहीवाशी होते. या अपघाताने भिणार गावात होळीच्या उत्सवात शोककळा पसरली आहे.
प्रल्हाद व मनोज दोघे होळी दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ढेकाले येथे गेले होते. होळीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुचाकी वरून घरी परत येत होते. त्यांची दुचाकी मुंबई अहमदाबाद महामार्गावर भरोळ गावाजवळ आली होती. त्यावेळी त्यांचे दुचाकी वरचे नियंत्रण सुटले. त्यानंतर त्यांच्या दुचाकीने संरक्षण भिंतीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अपघाताची नोंद मांडवी पोलीस ठाण्यात करण्यात आली. हा अपघात नक्की कशामुळे झाला याची तपास आता पोलीस करत आहेत. मात्र एकाच कुटुंबातील दोन तरुण या अपघातात गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय होळीच्या सणावर ही पाणी फिरले गेले आहे. घरातले दोन उमदे आणि करते तरुण गेल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.