- महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा असूनही त्याचा प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे
- यवतमाळ जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीवर १९ गुन्हे दाखल झालेत
- अद्याप या प्रकरणांमध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही
महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे. पण हा कायदा प्रभावी ठरत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला कारण ही तसेच आहे. हा कायदा असून ही त्याचा धाक पाहीजे तसा दिसत नाही. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर तर हा मुद्दा आणखी चर्चीला जात आहे. जादूटोणा, भोंदूगिरी,काळीजादू हे प्रकार सर्रास होत आहेत. राज्यात यवतमाळ जिल्ह्यात ही असे अनेक प्रकार समोर आले आहेत. विशेष म्हणजे गुन्हे दाखल होवून ही या प्रकरणात एका ही भोंदूला शिक्षा झालेली नाही.
यवतमाळ जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचे प्रकार थांबलेले नाहीत. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात अशा प्रकारचे 19 गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात 59 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, एकाही प्रकरणात अद्याप कुणाला ही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन कायदा असून ही तो प्रभावी ठरत आहे की नाही याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. यवतमाळमध्ये तर अशा पद्धतीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण शिक्षाच होत नसल्याने अशा भोंदूंची हिंमत वाढत आहे की काय असं बोललं जात आहे. त्यामुळे कठोर कारवाईची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात गुप्तधनाच्या मोहात आई-वडिलांनीच आपल्या मुलीचा नरबळी देण्याची तयारी केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र, मुलीच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आरोपींना अटक केली. तसेच, घाटंजी तालुक्यातील सपना पळसकर हत्याकांडही अंधश्रद्धेतून घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केवळ कायदा असून उपयोग नाही, तर कठोर कारवाई आणि व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस कटीबद्ध असल्याचे पोलीन निरिक्षक सतीश चावरे यांनी सांगितलं. जिल्ह्यात अशा घटना घडल्या आहेत. पण पोलीसांनी तातडीने कारवाई ही केल्याचे ते म्हणाले. असे प्रकार होवू नये म्हणून पोलीस ही काम करत आहेत. पण नागरिकांनी ही सतर्क राहण्याची गरज आहे. भोंदूबाबांच्या आमिषाला बळी पडू नये असं ही त्यांनी सांगितलं. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. त्याला बळी पडू नये असं आवाहन ही पोलीस प्रशासनाने केले आहे.