एकच शाळा, एकच दोर, एकच खांब; प्रेमाचं असं वेड की युगुलाने एकत्रच संपवली जीवनयात्रा

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
गडचिरोली:

मनिष रक्षमवार, प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे. येथील शेतातील झोपडीत गळफास घेऊन प्रेमी युगुलाने आपली जीवनयात्रा संपवली. लग्नाला विरोध झाल्याने या प्रेमी युगुलाने धक्कादायक पाऊस उचललं. तरुण वयात जुळलेल्या प्रेमप्रकरणात एका तरुण प्रेमीयुगलाने शेतातील झोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना मुलचेरा तालुक्यातल्या लक्ष्मीपूर येथे रविवारी घडली. लग्नाला घरातून विरोध होत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. जयदेब मिलन मंडल (20 वर्ष, रा.लक्ष्मीपूर) आणि अमेला अमित रॉय (18 वर्ष, रा.विजयनगर) अशी त्या तरुण-तरुणींची नावं आहेत. गावालगत असलेल्या शेतातील झोपडीत त्या दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतला. सकाळी खांबाला लटकलेल्या अवस्थेत दोघांचेही मृतदेह आढळले. ही घटना वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

नक्की वाचा - पोलिसांकडून 10 लाखांचं बक्षीस; 3 दिवसांनंतर पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणात मोठी अपडेट

माहिती मिळताच मुलचेरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोघांच्या मृतदेहाचे मुलचेराच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अमेला ही तरुणी विजयनगर येथील रहिवासी असून ती बारावीत शिकत होती, तर जयदेव याने बारावीनंतर शिक्षण सोडल्याची माहिती आहे.

हे दोघेही गांधीनगरच्या शाळेत शिकले आहेत. वर्ग वेगवेगळे असले तरी शाळा एकच होती. तिथेच त्यांचे सूर जुळल्याचे समजते. शनिवारच्या मध्यरात्री अमेला घरून बाहेर पडली. विजयनगर ते लक्ष्मीपूर या दोन गावातील अंतर जवळपास 5 किलोमीटर आहे. त्याचवेळी ती जयदेबला भेटली आणि त्या दोघांनी याजन्मी नाही, तर पुढच्या जन्मी एकत्र राहू, असा विचार करून एकत्रितपणे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.