- तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापती विजय यांच्या तमिळगा वेट्री कझगम पक्षाने 110 जागांवर आघाडी मिळवलीय
- विजय यांनी 18 ते 35 वयोगटातील तरुणांवर लक्ष केंद्रित करून प्रस्थापित द्रविड राजकारणाला धक्का दिला
- निवडणुकीत विजयांच्या TVK पक्षाने कुटुंबातील महिला प्रमुखांसाठी आर्थिक मदतीचे आश्वासनं दिले
तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेल्या थलापती विजय यांच्या 'तमिळगा वेट्री कझगम' (TVK) पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, विजय यांचा पक्ष 110 जागांवर आघाडीवर असून राज्यात सत्ता स्थापनेच्या दिशेने कूच करत आहे. प्रस्थापित DMK आणि AIADMK या दोन्ही पक्षांना धक्का देत विजय यांनी तमिळनाडूच्या राजकारणात 'किंग' म्हणून स्थान निर्माण केले आहे. निवडणुकीत त्यांनी दिलेली आश्वासनं गेम चेंजर ठरली आहेत. त्यामुळे त्यांनी प्रस्थापितांना धक्का दिला आहे.
तरुणाईची साथ आणि सोशल मीडियाची ताकद
निवडणूक प्रचारात विजय यांनी प्रामुख्याने 18 ते 35 वयोगटातील तरुणांवर लक्ष केंद्रित केले होते. प्रस्थापित द्रविड राजकारणाला कंटाळलेला तरुण वर्ग विजय यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे. विशेषतः महिला मतदारांमध्येही त्यांची मोठी क्रेझ दिसून आली. चित्रपट पडद्यावरील त्यांची 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा त्यांना राजकारणात एमजीआर (MGR) यांच्याप्रमाणेच यश मिळवून देताना दिसत आहे.
निवडणुकीतील आश्वासने
विजय यांच्या TVK पक्षाने काही आश्वासने निवडणुकीत दिली होती. त्याचा प्रभाव निकालात दिसला. कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा ₹2,500 थेट मदत देण्याचे आश्वासन दिले होते. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील वधूसाठी 8 ग्रॅम सोने आणि एक दर्जेदार रेशमी साडी देण्याचं त्यांनी सांगितलं. मोफत गॅस सिलेंडर, युवकांसाठी मासिक भत्ता, इंटर्नशिप आणि स्पर्धा परीक्षांसाठी मोफत AI-आधारित कोचिंग, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि आर्थिक मदत, तसेच शेतमजुरांना ₹10,000 मदत, प्रति कुटुंब ₹25 लाखांपर्यंत आरोग्य विमा, विधवा व दिव्यांगांना ₹3,000 मासिक पेन्शन, 200 युनिट मोफत वीज ही आश्वासनं गेम चेंजर ठरली.
राजकीय चाणाक्षपणा
विजय यांनी प्रचारादरम्यान सत्ताधारी DMK वर थेट निशाणा साधला. यामुळे सरकारविरोधी मते AIADMK कडे जाण्याऐवजी थेट TVK कडे वळली. तसेच, त्यांनी द्रविड विचारसरणीवर टीका न करता स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून सादर केले. ज्याचा फायदा त्यांना मतांच्या ध्रुवीकरणात झाला. तमिळनाडूमध्ये यंदा 85.1% मतदान झाले असून हा स्वातंत्र्यानंतरचा विक्रम आहे.
एमजीआर यांच्या आठवणी झाल्या ताज्या
विजय यांच्या या विजयाची तुलना आता दिग्गज नेते एम.जी. रामचंद्रन (MGR) यांच्याशी केली जात आहे. एमजीआर ज्याप्रमाणे लोकांच्या मनातील नायक होते, तशीच प्रतिमा विजय यांनी निर्माण केली आहे. स्वतःच्या चित्रपटांमधून समाजसेवेचा संदेश देणारे विजय प्रत्यक्षातही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात आले आहेत, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.
वडिलांचा वारसा आणि नवा प्रवास
चेन्नईत 1974 मध्ये जन्मलेल्या जोसेफ विजय चंद्रशेखर यांचा प्रवास बालकलाकार म्हणून सुरू झाला. त्यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 1992 मध्ये 'नालैया थीरपू' चित्रपटातून हिरो म्हणून पदार्पण करणाऱ्या विजय यांनी आज राजकारणात सर्वात मोठी झेप घेतली आहे. तामिळ जनतेने भरभरून मतदान करून विजय यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.