EVM तलावात फेकले, देशी बॉम्बचा वर्षाव! मतदानाच्या शेवटच्या टप्प्याला गालबोट

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याला हिंसाचाराचं गालबोट लागलंय.

Advertisement
Read Time: 2 mins
E
कोलकाता:

लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा शनिवारी (1 जून) होतोय. या टप्प्यात पश्चिम बंगालमधील 9 मतदारसंघात मतदान होतंय. या मतदानाला हिंसाचाराचं गालबोट लागलं. राज्यातील वेगवेगळ्या भागात तृणमूल काँग्रेस, इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) आणि भाजपा यांच्या कार्यकर्त्यात मारामारीच्या घटना घडल्या. मतदान केंद्रात निवडणूक एजंटला जाण्यापासून रोखण्यासाठी या पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. जादवपूर मतदारसंघातील भांगरमध्ये तृणमूल काँग्रेस आणि आयएसएफ यांच्या कार्यकर्त्यात संघर्ष झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर देशी बॉम्ब टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करताच त्यांनी एकमेकांच्याविरोधात आंदोलन सुरु केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला लाठीमार करावा लागला. यावेळी त्यांनी अनेक देशी बॉम्ब जप्त केले. जयनगर लोकसभा मतदारसंघातल्या कुलटुलीमध्ये तर नाराज मतदारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हेरिफायईड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशिन तलावात फेकून दिले. निवडणुकीत गोंधळ झाल्याच्या समजूतीमधून त्यांनी ही कृती केली. सकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा प्रकार घडला असल्याची माहिती पश्चिम बंगाल निवडणूक विभागाच्या कार्यालयानं 'एक्स'वर पोस्ट करुन दिली. 

निवडणूक कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात सेक्टर कार्यालयात FIR दाखल करण्यात आली असून योग्य ती कारवाई सुरु केली आहे. या भागातील सर्व सहा मतदान केंद्रावर आता शांततेत मतदान सुरु आहे. सेक्टर ऑफिसला नवं EVM आणि कागदं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

( नक्की वाचा : Exclusive : पंतप्रधानपदाची चॉईस कोण? काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी सांगितली 'मन की बात' )
 

तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचा गड समजला जाणाऱ्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात तृणमूल आणि भाजपा समर्थकांमध्ये संघर्ष झाला. भाजपा उमेदवार अभिजित दास यांनी सत्तारुढ तृणमूल काँग्रेसवर गोंधळाचा आरोप केलाय. तर तृणमूलनं हे आरोप फेटाळले आहेत. 

Advertisement

पक्ष कार्यालयाची तोडफोड

जादवपूरमधल्या बंगाल बागनमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर मारहाण केल्याचा आरोप केलाय. या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयातही तोडफोड केल्याचा आरोप माकपानं केलाय. तृणमूल काँग्रेसनं हे आरोप फेटाळलेत. त्यांनी डाव्या पक्षांवर मतदारांना धमकावल्याचा आरोप केलाय. 

( नक्की वाचा : PM मोदी कन्याकुमारीत दाखल होताच 33 वर्षांपूर्वीचा फोटो का होतोय Viral? )
 

बंगाल प्रदेश काँग्रेसनं निवडणूक आयुक्त आरिफ आफताब यांना पत्र लिहलंय. वेगवेगळ्या भागात होत असलेल्या कथित गोंधळाच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी काँग्रेसनं केलीय. संदेशखालीमधील बरमाजूर भागात भाजपानं तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत शुक्रवारी रात्री निवडणूक एजंटच्या घरी जाऊन धमकावल्याचा आरोप केलाय. 
 

Advertisement
Topics mentioned in this article