- मुंबईतील कार्टर रोडवर असलेला बंगला भारत भूषण, राजेंद्र कुमार आणि राजेश खन्ना या तिघांसाठी शापित ठरला
- भारत भूषण यांनी 1950 च्या दशकात हा बंगला खरेदी केला होता
- राजेंद्र कुमार यांनी 1960 मध्ये बंगला विकत घेऊन त्याचे नाव डिंपल ठेवले
माणसाचं नशीब आणि त्याचं घर यांचा जवळचा संबंध असतो, असं मानलं जातं. बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांसारख्या स्टार्ससाठी त्यांची घरं लकी ठरली. पण याच चंदेरी दुनियेत एक असाही बंगला होता ज्याने एक नाही तर तीन तीन दिग्गज अभिनेत्यांना यशाच्या शिखरावर नेऊन पुन्हा शून्यावर आणून सोडलं. या घराला बॉलीवूडचा 'शापित बंगला' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मुंबईतील कार्टर रोडवर असलेला तो बंगला केवळ एक इमारत नव्हती, तर बॉलीवूडच्या चढ-उतारांचा साक्षीदार होता. भारत भूषण, राजेंद्र कुमार आणि राजेश खन्ना या तिघांनीही या वास्तूत यशाचे सर्वोच्च शिखर गाठले. परंतु नियतीचा फेरा असा फिरला की याच घरामुळे त्यांच्या पदरी अपयश आणि विस्मृती आली. एकाच वास्तूने तीन पिढ्यांच्या सुपरस्टार्सना उद्ध्वस्त केल्याची ही कथा चित्रपटसृष्टीतील गूढ मानली जाते.
1950 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेते भारत भूषण यांनी हा बंगला खरेदी केला होता. या घरात आल्यावर 'बैजू बावरा' आणि 'मिर्झा गालिब' सारख्या चित्रपटांमुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र, हे यश फार काळ टिकले नाही. त्यांचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यानंतर भारत भूषण यांची आर्थिक स्थिती इतकी खालावली की ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्यातून ते कधीच सावरू शकले नाही. त्यांचे करिअर पुर्ण पणे उद्धवस्त झाले. ते बॉलिवूडमधून अक्षरश: बाजूला फेकले गेले. एकेकाळचा हा सुपरस्टार जणू रस्त्यावर आला होता. हे बॉलिवूडने पाहीले.
1960 मध्ये भारत भूषण यांनी हा बंगला केवळ 60,000 रुपयांना राजेंद्र कुमार यांना विकला. त्यावेळी राजेंद्र कुमार हे यशाच्या शिखरावर होते. सुपरस्टारमध्ये त्यांची गणना होत होती. बंगला घेतल्यानंतर राजेंद्र कुमार यांनी आपल्या मुलीच्या नावावरून या घराचे नाव 'डिंपल' ठेवले. या घरात राहायला आल्यावर त्यांचे 'मदर इंडिया' आणि 'धूल का फूल' सारखे चित्रपट गाजले. राजेंद्र कुमार यांना 'ज्युबिली स्टार' म्हटले जाऊ लागले. पण पुन्हा तोच इतिहास घडला. काही वर्षांतच त्यांचे यश ओसरले आणि त्यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. जे भारत भूषण यांच्या सोबत झाले तिच स्थिती राजेंद्र कुमार यांच्यावर ही ओढवली. त्यातून ते शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत. या बंगल्यात आल्यानंतर हा दुसरा सुपरस्टार होता ज्याचे करिअरच संपले.
1969 मध्ये राजेश खन्ना यांनी हा बंगला 3.5 लाख रुपयांना विकत घेतला. त्यावेळी बॉलिवूडमध्ये राजेश खन्ना म्हणजे बडं प्रस्थ होतं. त्यावेळी राजेश खन्ना यांचे एकछत्री वर्चस्व होते. ते या बंगल्यात राहायला आल्यानंतर त्यांनी त्याचे नाव बदलून 'आशीर्वाद' ठेवले. या घरात असताना राजेश खन्ना यांनी सलग 15 सुपरहिट चित्रपट देण्याचा विक्रम केला. ते देशाचे पहिले सुपरस्टार बनले. मात्र, त्यानंतर त्यांच्या करिअरला अशी उतरती कळा लागली की ते पुन्हा सावरू शकले नाहीत. याच 'आशीर्वाद' बंगल्याच्या भिंतींनी त्यांचे वैभव आणि नंतर त्यांचे एकाकीपणही पाहिले. शेवटच्या काळात ते एकटेच या बंगल्या राहात होते. त्यांचा मृत्यू ही याच बंगल्यात झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world