Mukesh Khanna Getting Married: प्रसिद्ध अभिनेते आणि छोट्या पडद्यावरील 'शक्तिमान' म्हणून ओळखले जाणारे मुकेश खन्ना यांनी वयाच्या 67व्या वर्षी लग्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी अफेअर आणि गर्लफ्रेंड या विषयाबाबतही आपले विचार मांडले आहेत. मुकेश खन्ना अजूनही अविवाहित आहेत, पण त्यांनी अलीकडेच त्यांनी म्हटलंय की, "लग्न हे नशिबाने ठरलेले असते. पत्नी सहज मिळत नाही, ती नशिबात लिहिलेली असावी लागते". मुकेश खन्ना यांनी 'फिल्मी चर्चा'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर मोकळेपणाने भाष्य केले. ते म्हणाले की,"अनेक लोकांना वाटते की जर कोणी लग्न करत नसेल, तर त्याचा विवाह संस्थेवर विश्वास नाही. पण माझा विचार याच्या अगदी उलट आहे. मी लग्नाला अत्यंत पवित्र मानतो." त्यांच्या मते लग्न म्हणजे दोन आत्म्यांचे मिलन आहे, जे पूर्वजन्मीच्या कर्मांशी आणि नियतीशी जोडलेले असते.
अफेअरला पुरुषार्थ मानत नाहीत मुकेश
अभिनेत्याने समाजात प्रचलित असलेल्या एका चुकीच्या धारणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की,"काही लोकांचा असा समज आहे की जितके जास्त अफेअर, तितके जास्त पुरुषत्व. मी या विचाराचा पूर्णपणे निषेध करतो." त्यांनी सांगितले की त्यांच्या एका चित्रपट निर्मात्या मित्राचाही असाच समज होता, पण त्यांनी स्वतः कधीही त्या मार्गाचा अवलंब केला नाही. पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी अनेक गर्लफ्रेंड बनवण्याची गरज नाही; ते सिद्ध करण्याचे इतर अनेक चांगले मार्ग आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
(नक्की वाचा: Aamir Khan: आमिर खानने स्वीकारली आयुष्यातील ती चूक, गौरी स्प्रॅटबाबत केले मोठे विधान; लग्न न टिकण्याचंही सांगितलं कारण)
मुकेश खन्ना महिलांचा मनापासून आदर करतात. त्यांच्या मते विवाहित पुरुषांनीही आपल्या पत्नीशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिले पाहिजे. समाजात फक्त 'पतिव्रता' स्त्रीबद्दल बोलले जाते, पण 'पत्नीव्रता' पुरुषाबद्दल का बोलले जात नाही? अशा दुटप्पी धोरणावर त्यांनी टीका केली.
प्रेम आणि लग्नाबाबत मुकेश खन्ना यांचे विचार
खऱ्या प्रेमाबाबत बोलताना मुकेश खन्ना म्हणाले की, "खरे प्रेम आयुष्यात एकदाच होते, बाकी सर्व फक्त आकर्षण असते. आजकाल लोक सहजपणे 'मूव्ह ऑन' होतात, ज्यामुळे प्रेमाचा खरा अर्थच हरवत चालला आहे." ते पुढे म्हणाले की, जर तुम्ही कोणाला 'आय लव्ह यू' म्हणतं आणि लगेच दुसऱ्या व्यक्तीकडे वळतं, तर ते प्रेम असूच शकत नाही. लग्नाबाबत ते म्हणतात की, ही नशिबाची गोष्ट आहे. योग्य वेळी योग्य जोडीदार मिळतो आणि लग्नासाठी वय हा अडथळा नसतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world