Deool Band 2 crosses 100 crore : 'देऊळ बंद २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटाने ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. 'सैराट', 'राजा शिवाजी'नंतर आता देऊळ बंद २ नेही १०० चा टप्पा पार केला आहे. देऊळ बंद चित्रपटाचं बजट १० कोटींपर्यंत आहे, आणि अवघ्या काही दिवसात या चित्रपटाने तब्बल १०० कोटींची कमाई केल्याने पुन्हा एकदा देशात मराठीचा डंका वाजला आहे. विशेष म्हणजे देऊळ बंद २ हा २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला आहे. 'देऊळ बंद २'ने बॉक्स ऑफिसवर 'क्रांतिज्योती विद्यालय ' चित्रपटालाही मागे टाकलं आहे.
देऊळ बंद २ चा १०० कोटींचा टप्पा पार...
दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत ही गुड न्यूज शेयर केली आहे. यावेळी त्यांनी लिहिलंय, ‘देऊळ बंद २' ने १०० कोटींचा टप्पा पूर्ण केला, ही बातमी ऐकताना मनापासून आनंद झाला. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा केवळ एक व्यावसायिक आकडा नाही; हा आपल्या मातीतल्या कथांवर, आपल्या मातीतल्या कलाकारांवर आणि आपल्या मातीतल्या प्रेक्षकांच्या भावविश्वावर ठेवलेल्या विश्वासाचा विजय आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल परमस्नेही प्रवीण दादा यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
प्रवीण तरडेंच्या पत्नीच्या अभिनयाचं होतंय कौतुक...
देऊळ बंद २ हा चित्रपट अंधश्रद्धा, श्रद्धा आणि नास्तिकता या विषयांवर भाष्य करतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं असून त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. या चित्रपटातील संगीता नावाचं पात्र एका शेतकऱ्याची पत्नी आहे. शेतकऱ्याच्या आयुष्यात आलेल्या अडचणींतून ती नास्तिक बनते आणि देवाच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित करते. शेवटी स्वामी समर्थ (मोहन जोशी) सामान्य रुपात येऊन तिच्यासोबत प्रवास करीत असताना तिचं समुपदेशन करतात. आत्महत्येतून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, बदलत्या काळात शेतीत आणि विचारात बदल करण्याची आवश्यकता असल्याचा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world