Mirza Rafi Ahmed Baig Passes Away: मराठी साहित्य विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या खुमासदार नर्मविनोदी शैलीने नवी दिशा देणारे, 'हास्यसम्राट' म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज, शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी पहाटे ६.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते आणि अमरावती येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने विदर्भ आणि मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा हे डॉ. मिर्झा बेग यांचे मूळ गाव. सध्या ते अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात 'मिर्झा एक्सप्रेस' या त्यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता पुत्र रमीज आणि दोन कन्या - महाजबी व हुमा असा परिवार आहे. आज दुपारी दोननंतर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. मिर्झा बेग हे विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले होते. वयाच्या अवघ्या अकरा वर्षांपासून त्यांनी कविता लेखनाला प्रारंभ केला आणि १९७० पासून त्यांनी मंचावर आपली कला सादर करायला सुरुवात केली. पुढील ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याच्या कवी संमेलनाचे केंद्रस्थान भूषवले. त्यांची 'मिर्झा एक्सप्रेस' ही काव्य मैफल संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय ठरली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी या कार्यक्रमाचे ६ हजारांहून अधिक सादरीकरण केले. त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
शेती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील प्रश्न आणि सामाजिक व राजकीय विरोधाभास यांसारख्या गंभीर विषयांवर नर्मविनोदी आणि खुमासदार शैलीत भाष्य करणे, ही त्यांची हातोटी होती. वृत्तपत्रांमधून त्यांचे लेखन नियमित प्रसिद्ध होत असे आणि 'मिर्झाजी कहीन' हा त्यांचा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता. मोठा माणूस', 'सातवा महिना', 'उठ आता गणपत', आणि 'जांगडबुत्ता' यांसारख्या त्यांच्या कविता विशेष लोकप्रिय ठरल्या. 'जांगडबुत्ता' या शब्दाचे जनक म्हणूनही ते ओळखले जातात.
Girija Oak : 'आई-वडील वेगळे झाल्यावर मला वाटलं...' अभिनेत्री गिरीजा ओकने सांगितला 'तो' भयंकर अनुभव
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world