मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या महिला तहसीलदार अमृता सिंह तोमर यांना कोट्यवधींच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
संपूर्ण प्रकरण 2021 मधील आहे. त्यावेळी बडोदा तहसीलमध्ये आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी शासनाने मदत निधी जाहीर केला होता. पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या 2.5 कोटी रुपयांच्या निधीत मोठी अफरातफर आणि गैरव्यवहार झाल्याचा ठपका तोमर यांच्यावर आहे. चौकशीदरम्यान अमृता तोमर यांचे नाव प्रामुख्याने समोर आले, ज्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलीस ही कारवाई केली.
(नक्की वाचा- Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)
अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव
अटक टाळण्यासाठी अमृता तोमर यांनी उच्च न्यायालय (High Court) आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही न्यायालयांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन नाकारल्यानंतर त्या काही काळ बेपत्ता होत्या. मात्र काही दिवसांतच पोलिसांना त्यांना अटक केली.
पदावरून उचलबांगडी आणि अटक
अमृता तोमर या विजयपूर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. मात्र, अटकेच्या केवळ एक दिवस आधी कलेक्टर अर्पित वर्मा यांनी त्यांना पदावरून हटवले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक सुधीर कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक मदतीने तोमर यांचा माग काढला आणि ग्वाल्हेरमधील चंद्रावदनी नाका येथील त्यांच्या घरातून त्यांना ताब्यात घेतले.
(नक्की वाचा- Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा)
KBC मधील यश
अमृता तोमर यांनी केबीसीमध्ये 50 लाख रुपये जिंकले होते, ज्यामुळे त्या 'सेलिब्रिटी तहसीलदार' म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र, आता त्याच नावावर भ्रष्टाचाराचा मोठा डाग लागला आहे. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची शिवपुरी जेलमध्ये रवानगी केली आहे.