Kranti Redkar Exclusive: "पाकिस्तानातून धमक्या येतायत!" क्रांती रेडकरची खळबळजनक माहिती

आर्यन खान प्रकरण आणि 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजच्या रिलीज नंतर वानखेडे कुटुंबीयांना सतत धमक्या आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. क्रांती रेडकर यांनी सांगितले की, आम्हाला धमक्या येत आहेत, यात पाकिस्तानातूनही मेसेज येत आहेत. याचिकेत आम्ही हे सर्व नमूद केले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील नव्या वादाला आता कायदेशीर वळण लागले आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजमुळे समीर वानखेडे यांनी शाहरुख खानची कंपनी 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' आणि नेटफ्लिक्सवर दिल्ली उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

समीर वानखेडे यांच्या याचिकेवर क्रांती रेडकर यांनी प्रकरण न्यायालयात असल्याने थेट बोलणे टाळले आहे. मात्र त्यांनी त्यांच्या पतीच्या बाजूने ठामपणे भूमिका मांडली. समीर वानखेडे गेल्या काही महिन्यांपासून अनेक घडामोडी आणि आरोपांचा सामना करत आहेत. मात्र समीर छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आपले आदर्श मानतात. त्यामुळे स्वाभिमानाला ठेच लागलेली ते सहन करणार नाहीत, असे क्रांती रेडकर यांनी म्हटलं.

आत्मसन्मानासाठी त्यांनी हा लढा पुकारला आहे. स्वतःच्या आत्मसन्मानासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल अजिबात चुकीचे नाही. मी बायको म्हणून त्यांच्यासोबत आहे," असेही क्रांती यांनी ठामपणे सांगितले.

पाकिस्तानातूनही धमक्या

आर्यन खान प्रकरण आणि 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजच्या रिलीज नंतर वानखेडे कुटुंबीयांना सतत धमक्या आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. क्रांती रेडकर यांनी सांगितले की, आम्हाला धमक्या येत आहेत, यात पाकिस्तानातूनही मेसेज येत आहेत. याचिकेत आम्ही हे सर्व नमूद केले आहे.

Advertisement

आम्हाला सतत ट्रोल केलं जात आहे, पण जनता मूर्ख नाही. ज्यांनी समीरचे काम पाहिले आहे आणि ज्यांना कायदे कळतात, ते आमच्या बाजूने नेहमी उभे आहेत. आम्ही सत्याची बाजू मांडत राहणार. आमच्याकडे तेवढंच आहे. आमच्याकडे काही कोट्यवधी रुपये पडलेले आहेत, असं नाही. आमच्याकडे फक्त सत्याची बाजू आहे आणि ती आम्ही मांडत राहणार आहोत. समीर यांनी आयुष्यभर देशाची सेवा केली आहे, त्यामुळे स्वाभिमानाला ठेच लागली तर ते गप्प बसणार नाही. सध्या ते तेच करत आहे, असंही क्रांती रेडकर यांनी म्हटलं.

इंडस्ट्रीमध्ये काम करणे कठीण

या सगळ्या प्रकारानंतर मला इंडस्ट्रीमध्ये कामं मिळणे कठीण झालं आहे. मात्र मला त्याबद्दल अजिताबत खंत नाही. एक लढाई लढताना काही तरी गमवावं लागतं. मराठी इंडस्ट्रीचा मला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र हिंदी इंडस्ट्रीमध्ये मला काम मिळवणे कठीणच जाणार आहे, असं क्रांती रेडकर यांनी म्हटलं.

Advertisement

काय आहे प्रकरण?

'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजच्या एका सीनमध्ये समीर वानखेडे यांची खिल्ली उडवल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. 2021 मध्ये, समीर वानखेडे एनसीबी (NCB) मुंबईचे झोनल डायरेक्टर असताना, त्यांनी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. याच घटनेचा आधार घेत या सीरिजमध्ये आपली खिल्ली उडवण्यात आल्याचा आणि त्यामुळे आपली बदनामी झाल्याचा दावा करत वानखेडे यांनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि नेटफ्लिक्स कंपनीवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.