दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका 'ओम नम: शिवाय'चे दिग्दर्शक धीरज कुमार यांचं मंगळवारी निधन झालं आहे. ते 79 वर्षांचे होते. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यातच त्यांचं निधन झालं. (Dheeraj Kumar Passed Away At The 79 Age)
निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता टी. धीरज कुमार यांना शनिवारी श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला होता. यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. न्यूमोनियामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यादरम्यान धीरज कुमार यांचं निधन झाल्याची माहिती आहे.
कोण होते धीरज कुमार? (Who Was Dheeraj Kumar?)
धीरज कुमार 1965 साली एका टॅलेंट हंटच्या स्पर्धेच्या माध्यमातून चित्रपटात आले होते. या टॅलेंट हंटमध्ये त्यांच्यासोबत प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आणि राजेश खन्नाही सामील झाले होते. ही स्पर्धा राजेश खन्नाने जिंकली होती आणि धीरज कुमार फायनलिस्ट होते. करिअरच्या सुरुवातील त्यांनी मॉडलिंग केली आणि अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचा पहिला चित्रपट दीदार आणि त्यानंतर रातों का राजा. हे दोन्ही चित्रपट 1970 मध्ये प्रदर्शित झाले आणि त्यांचं अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं.
देव आनंदच्या 'हिरापन्ना' आणि मनोज कुमार यांच्या 'रोटी कपडा और मकान'सारख्या चित्रपटातून धीरज कुमार यांना अभिनय क्षेत्रात खास ओळख मिळाली. यानंतर क्रांती आणि सरगम सारख्या यशस्वी चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. हिंदी चित्रपटांशिवाय त्यांनी पंजाबी चित्रपटातही अभिनय केला आणि पंजाबी चित्रपटांचे सुपरस्टार झाले. त्यांनी साधारण 21 पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि लोकप्रियता मिळवली.अभिनयाव्यतिरिक्त ते निर्माता आणि दिग्दर्शक देखील होते. त्यांनी अनेक धार्मिक मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 2004 मध्ये "आबरा का डाबरा" नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांनी स्वत:ची प्रोडक्शन कंपनी क्रिएटिव्ह आयची सुरुवात केली. ज्याअंतर्गत त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती केली.