Salary Credited but Account empty next day : आता कुठे जून महिना संपला आहे. अनेकांचा पगार आज १ जुलै तर काहींचा ३० जून रोजी झाला असेल. विषय आहे की ज्यांच्या खात्यात ३० जून रोजी पगार आला, आज १ जुलै रोजी त्यांच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत. तुमचा किती पगार वाचतो? घर भाडं किंवा होमलोन, मुलांच्या शाळेची फी, मोबाइल-टीव्ही-वायफाय रिचार्ज, क्रेडिट कार्डाचं बिल आणि इतर खर्च पूर्ण करता करता अनेकांच्या बँकेत ३० टक्के सॅलरीदेखील शिल्लक राहत नाही.
काही वर्षांपर्यंत महिन्याला १ लाख किंवा त्याहून अधिक पगार मोठा मानला जात होता. लोकांना वाटायचं की, इतक्या पैशात आरामदायी आयुष्य जगता येईल. मात्र आता मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या प्रोफेशनल्सचं चित्र बदललं आहे.
आज चांगला पगार मिळाल्यानंतर महिना अखेर अनेकांचा खिसा रिकामी होतो. अकाऊंटमध्ये पगार येताच आवश्यक गोष्टी पूर्ण कराव्या लागतात आणि पुढच्या सॅलरीची प्रतीक्षा असते. म्हणजे कमाई मोठी मात्र आर्थिक सुरक्षितता आधीसारखी नसते.
१ लाख सॅलरीचा अर्थ आता बदलला...
लोन्सजगतचे सह-संस्थापक हर्ष ग्रोव्हर म्हणतात की, समस्या केवळ उत्पन्नाची नाही. खरं कारण आहे की, जसं उत्पन्न वाढतं, तसे लोकांचे खर्च आणि अपेक्षाही वाढतात. बऱ्याच लोकांना वाटतं की, जास्त पगार मिळाल्याने त्यांचे आर्थिक जीवन आपोआप मजबूत होईल. पण हे नेहमीच खरं नसतं. यामुळेच अनेक लोक, चांगलं कमावूनही, पैसे वाचवू शकत नाहीत. त्यांचे जीवन बाहेरून जरी आरामदायक दिसत असलं, तरी त्यांची आर्थिक परिस्थिती दिसते तितकी मजबूत नसते.
आर्थिक तज्ज्ञ याला लाइफस्टाइल इन्फ्लेशन म्हणतात. सॅलरी वाढल्यानंतर लोक नवा मोबाइल खरेदी करतात, मोठं घर घेतात, बाहेर फिरणं, रेस्टॉरंटमध्ये नियमित जाणं वाढतं. पर्सनल खर्चही वाढतो. प्रत्येक खर्च जर वेगवेगळा पाहिला तर लहान वाटतो, मात्र सर्व मिळून अतिरिक्त कमाईचा मोठा भाग संपतो. हेच कारण आहे की, उत्पन्न वाढत असलं तरीही सेव्हिंग शिल्लक राहत नाही. अनेक उच्च पगाराचे लोकही या चक्रात अडकतात. त्यांचं लाइफस्टाइल चांगलं होतं, मात्र संपत्ती निर्मितीचा वेग वाढत नाही.
मोठ्या पगारातून आर्थिक सुरक्षा मिळत नाही...
हर्ष ग्रोवर यांनी सांगितलं की, प्रत्येक महिन्याला चांगला पगार अनेकदा लोकांना खोटी आश्वासने देतो. १ लाख किंवा त्याहून अधिक सॅलरी आज आराम देऊ शकते, मात्र भविष्य पूर्णपणे सुरक्षित होईल याची शाश्वती देता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे आपत्कालीन निधी, गुंतवणूक आणि दीर्घकालीन मालमत्ता नसेल, तर नोकरी गमावल्यास किंवा इतर कोणत्याही संकटाच्या वेळी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या मते आर्थिक सुरक्षितता केवळ प्रत्येक महिन्याला पैसे कमावण्यातून येत नाही, मात्र पगार येणं बंद झालं तरीही तुमची आर्थिक स्थिती नियंत्रणात असायला हवी.
एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणं जोखमीचं...
अधिकांश नोकरी करणाऱ्या लोकांची संपूर्ण फायनॅन्शियल लाइफ केवळ एका इनकमवर आधारित असते. घराचं किराणा, रेशन, मुलाचं शिक्षण, प्रवास आणि भविष्याचं प्लानिंग, सर्वकाही एकाच पगारातून करावं लागतं. इतर वेळी हे सर्व ठीक वाटतं, मात्र नोकरी गमावली किंवा करियर बदललं तर याचा मोठा फटका बसू शकतो. ग्रोवर यांनी सांगितलं की, वेळेसह लोक अतिरिक्त उत्पन्नाच्या स्त्रोताचा विचार केला तर आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते.
गुंतवणूक टाळणं पडू शकतं महागात...
अनेक लोक चांगली कमाई असतानाही गुंतवणूक सुरू करत नाही. कधी सुट्ट्यांचं प्लानिंग, कधी नवा गॅजेट आणि कधी कुटुंबाच्या खर्चामुळे गुंतवणूक पुढे ढकललं जातं. लोकांना वाटतं की, जेव्हा पगार अधिक वाढेल तेव्हा गुंतवणूक सुरू करू. मात्र या विलंबाची किमत नंतर भरावी लागू शकते. ग्रोवरनुसार, संपत्ती बनविण्यात सर्वात मोठी भूमिका पगार नाही तर वेळेवर सुरुवात आणि नियमित गुंतवणुकीचं असतं. योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा लवकर सुरुवात करणे आणि नियमित गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरते.
केवळ कमाई नाही, संपत्ती बनविणंही आवश्यक...
याच कारणामुळे चांगली कमाई करणारे अनेक लोकसुद्धा आर्थिक दबावाखाली येतात. हर्ष ग्रोवर म्हणतात की, आता आपण केवळ अधिक पैसे कमावण्यावर नव्हे, तर योग्य प्रकारे संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. पगार वाढतो. पण लोकांच्या गरजा आणि इच्छा त्याहूनही वेगाने वाढत आहेत, तेव्हा केवळ उत्पन्न वाढवणं पुरेसं नाही.