राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
“थ्रस्ट मिळाला नाही…कोसळतोय…मेडे! मेडे! मेडे!” — हे एअर इंडिया फ्लाइट 171 च्या कॉकपिटमधून नोंदवले गेलेले शेवटचे शब्द होते. बोईंग ड्रिमलायनर विमान गुरुवारी अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर कोसळताना वैज्ञानिकाचे शेवटचे शब्द होते. वैमानिकाने विमानात नेमकी काय गडबड झालीये हे आधीच सांगितलं होतं. विमानाच्या इंजिनला पॉवर म्हणजेच थ्रस्ट न मिळाल्याने ते वर उडू शकलं नाही आणि थेट खाली कोसळल्याचं सांगितलं जात आहे.
(थ्रस्ट म्हणजे इंजिन पॉवर)
अहमदाबाद पोलिसांनी वैमानिकाचा हा थरारक ‘डिस्ट्रेस कॉल' खरा असल्याचे स्पष्ट केले आहे. एकदा विमानाने हवाई मार्ग नियंत्रण केंद्राशी (ATC) संपर्क गमावला, त्यानंतर सर्व संपर्क थांबले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 3.5 किमी लांब धावपट्टी पूर्णपणे पार केली होती. ही धावपट्टी मोठ्या जेट विमानांसाठी पुरेशी असते, असं सांगितलं जात आहे. “विमानाने खूपच लांब रोल घेतला होता, पण आवश्यक जोर (थ्रस्ट) मिळाला नाही, एका अधिकाऱ्याने सांगितले.
दोन दिवसांनंतर आणखी दोन मृतदेह सापडले
• एक मृतदेह, जो एअर होस्टेसचा असल्याची शक्यता आहे विमानाच्या शेपटीतून मिळाला. मृतदेहाचे अवशेष हॉस्टेलच्या गच्चीवर सापडले.
• अजून एक मृतदेह हॉस्टेलच्या ढिगाऱ्यातून मिळाला.
• 6 प्रवाशांची ओळख DNA नमुन्यांद्वारे निश्चित करण्यात आली.
• 230 जणांचे DNA नमुने गोळा केले गेले असून यामध्ये 21 परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांचाही समावेश आहे.
• प्रत्येक कुटुंबाला 1 कोटी आणि एकमेव वाचलेल्या प्रवाशाला 25 लाखांची अंतरिम मदत देण्यात येणार आहे.
तपास सुरू – ‘ब्लॅक बॉक्स' अहवालाची प्रतीक्षा
सूत्रानुसार, ब्लॅक बॉक्स मिळाल्यावरच निष्कर्ष देता येतील. कोणतीही पूर्वसूचना वा चेतावणी मिळाली नव्हती. ना एटीसी ना ग्राउंड कर्मचाऱ्यांना इंजिनमध्ये कोणतीही बिघाडाची नोंद मिळाली होती. सर्व संपर्क आणि सुरक्षा प्रोटोकॉल्स व्यवस्थित होते. सीसीटीव्ही फुटेजवरून असंही स्पष्ट झाले आहे की, विमानाने धावपट्टीचा टप्पा पार केला होता. ना विंग फ्लॅप्समध्ये बदल झाले, ना लँडिंग गिअरमध्ये काही अडथळा. दृष्यमानता चांगली होती, हवामान देखील उड्डाणासाठी योग्य होते.
भारतीय नागरी विमान उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी सांगितलं की, एअर इंडियाच्या ३३ बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानांची तातडीने तपासणी सुरू आहे. गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून, ती कारणमीमांसा करणार आणि सुरक्षा उपाययोजना सुचवणार आहे. यावर मंत्री म्हणाले, चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि आता विमान पुन्हा सेवेत आणण्याच्या प्रक्रियेत आहोत. एअर इंडियाने सांगितले की, हे विमान सध्या दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणांसाठी वापरले जात आहे. तपासणी आणि देखभाल वेळेत पूर्ण केली जाईल.