गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान कोसळल्याची अत्यंत दु:खद घटना घडली. या दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 क्रू मेंबर्स होते. दरम्यान NSG ने विमान कोसळल्यानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे. आता या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. हा ब्लॅक बॉक्स काय असतो? कशा पद्धतीने या ब्लॅक बॉक्सच्या मदतीने विमान दुर्घटनाग्रस्त होण्यासंदर्भात अनेक गूढ समोर येऊ शकतील. यामागील तंत्रज्ञान काय असतं, याबाबत समजून घेऊया.
ब्लॅक बॉक्स काय असतो?
प्रत्येक विमानाला ब्लॅक बॉक्स नावाचं एक उपकरण असतं. विमानातील घडामोडी रेकॉर्ड करण्याचं काम या उपकरामार्फत केली जाते. याचं नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी याचा रंग नारंगी रंगाचा असतो. अपघातानंतर ब्लॅक बॉक्स शोधायला मदत व्हावी यासाठी याचा रंग नारंगी दिला जातो. विमानाच्या मागील भागात ब्लॅक बॉक्स ठेवला जातो.
ब्लॅक बॉक्सची दोन भागात विभागणी..
एक ब्लॅकबॉक्स दोन भागात विभागलेला असतो. यातील एक CVR असतो, ज्याला Cockpit Voice Recorder म्हटलं जातं. यामध्ये पायलट, सह पायलटमधील संभाषण, अलार्म आणि कॉकपिटचा आवाज रेकॉर्ड होतो. दुसऱ्या भागाला FDR म्हणजे Flight Data Recorder म्हटलं जातं. यामध्ये विमानाची उंची, गती, दिशा, इंजिनची स्थिती आणि तांत्रिक डेटा रेकॉर्ड होतो. जेव्हा एखाद्या विमानाची दुर्घटना होते, तेव्हा ब्लॅक बॉक्सच्या मदतीने अपघातापूर्वीची स्थिती लक्षात येऊ शकते. हा ब्लॅक बॉक्स अत्यंत मजबूत असतो. त्यामुळे विमानाचा मोठा अपघात झाला तरीही या ब्लॅक बॉक्सला काहीच होत नाही. जगभरातील अनेक विमान अपघातांमागील कारण केवळ या ब्लॅक बॉक्समुळे सोडविण्यात आलं आहे. या ब्लॅक बॉक्समध्ये मिळालेल्या डेटाच्या आधारावर एव्हिएशन क्षेत्राशी संबंधित नियम-कायदे तयार झाले आहेत.
अपघाताचं गूढ कसं उलगडतं?
विमानाचा अपघात होतो तेव्हा तपास यंत्रणा प्रथम ब्लॅक बॉक्स शोधण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यात विमानाबद्दलची सर्वात महत्त्वाची माहिती मिळते. या उपकरणात एक छोटासं सिग्नल देणारं यंत्र असतं. जे पाण्यात पडल्यानंतरही 30 दिवसांपर्यंत आपली लोकेशनची माहिती देऊ शकतं. यामुळे ब्लॅक बॉक्स शोधायला सोपं जातं. जेव्हा तपासकर्त्यांना ब्लॅक बॉक्स मिळतो तेव्हा ते एका विशेष संगणक प्रणालीच्या मदतीने त्यात नोंदवलेली सर्व माहिती पाहतात. पायलटचं शेवटचं संभाषण, अलार्मचा आवाज आणि तांत्रिक बिघाडाची माहिती मिळते. याच्या मदतीने अपघाताचं कारण तांत्रिक बिघाड होता की हवामान किंवा मानवी चूक याबाबतची माहिती मिळते. त्यामुळे खरं कारण शोधण्यात ब्लॅक बॉक्सची मोठी मदत होते.