- अलिगडमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात हिंदूवादी नेते ज्ञानेंद्र चौहान यांनी मान कापण्याची भाषा केली
- चौहान यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाने संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे
- चौहान यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले
Aligarh Controversial Statement: उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये एका हिंदूवादी नेत्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट मान कापण्याची भाषा केल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. शिवाय यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या नेत्याच्या अशा वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या नंतर प्रशासन ही अॅक्शन मोडवर आलं आहे. त्यांनी सर्वांनाच संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. हनुमान चालीसा पठण कार्यक्रमा दरम्यान हा प्रकार घडला.
अलिगडमध्ये आयोजित हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमात हिंदूवादी नेते ज्ञानेंद्र चौहान यांनी हे प्रक्षोभक विधान केले आहे. "हिंदू बहीण-लेकींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची मान कापून टाकली जाईल," असे ते भरमंचावरून म्हणाले. एका धार्मिक कार्यक्रमात अशा प्रकारची टोकाची भाषा वापरल्याने उपस्थित भाविकही काही काळ अवाक झाले. याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. हा विधान त्यांनी जाणीव पूर्वक केले आहे का याची ही चर्चा होत आहे.
या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. यानंतर अनेक सामाजिक आणि राजकीय स्तरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी याला चिथावणीखोर वक्तव्य ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आपल्या भाषणात चौहान यांनी हिंदू समाजाला जाती-पातीच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्याचे आवाहन केले. "आता केवळ प्रशासनाच्या कारवाईची वाट पाहून चालणार नाही, तर समाजाला स्वतःच्या लेकी-बाळींच्या संरक्षणासाठी उभे राहावे लागेल," असेही त्यांनी ठामपणे मांडले.
ज्ञानेंद्र चौहान हे करणी सेनेचे माजी वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले असून, ते आपल्या आक्रमक विधानांसाठी ओळखले जातात. त्यांच्या या विधानामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर अलिगड जिल्हा प्रशासन किंवा पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अशा प्रकारच्या भाषणांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world