Amit Shah on English : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजीचा वापर करणाऱ्या लोकांबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. लवकरच या लोकांना लाज वाटेल, असे ते म्हणाले. राष्ट्रभक्तीची खरी ओळख भारतीय भाषांमध्येच आहे, यावर जोर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. शाह पुढे म्हणाले की, भारताच्या भाषिक वारशाचा अभिमान बाळगून जगाचे नेतृत्व करण्याची आणि आपल्या मातृभाषांना पुन्हा योग्य स्थान देण्याची वेळ आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी सनदी अधिकारी, आयएएस आशुतोष अग्निहोत्री यांनी लिहिलेल्या 'मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शाह म्हणाले, "या देशात, इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल, असा समाज लवकरच निर्माण होईल. दृढनिश्चयी लोकंच बदल घडवू शकतात.आपल्या देशातील भाषा आपल्या संस्कृतीचे रत्न आहेत. आपल्या भाषांशिवाय आपण खरे भारतीय राहू शकत नाही, हा माझा विश्वास आहे.
आपला देश, आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपला धर्म समजून घेण्यासाठी कोणतीही परदेशी भाषा पुरेशी नाही. अपूर्ण परदेशी भाषांद्वारे संपूर्ण भारताची कल्पना करता येत नाही. ही लढाई किती कठीण आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे, पण मला खात्री आहे की भारतीय समाज ही लढाई जिंकेल. पुन्हा एकदा, आत्मसन्मानाने, आपण आपल्या देशाचा कारभार आपल्या भाषांमध्ये चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू.
( नक्की वाचा : Rashmi Thackeray : उद्धव नाही रश्मी ठाकरे पक्ष चालवतात! पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप )
अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी अमृतकाळासाठी 'पंच प्रण'ची (पाच प्रतिज्ञा) पायाभरणी केली आहे. विकसित भारताचे लक्ष्य गाठणे, गुलामगिरीच्या प्रत्येक खुणापासून मुक्ती मिळवणे, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि एकजुटीसाठी कटिबद्ध राहणे आणि प्रत्येक नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना जागृत करणे - या पाच प्रतिज्ञा 130 कोटी लोकांचा संकल्प बनल्या आहेत. म्हणूनच 2047 पर्यंत आपण सर्वोच्च स्थानी असू आणि या प्रवासात आपल्या भाषा महत्त्वाची भूमिका बजावतील.
माजी सनदी अधिकारी आयएएस आशुतोष अग्निहोत्री यांच्या पुस्तकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले.