
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारांचा कौल या निवडणुकांमधून समजणार आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकांच्या तयारीला लागल्या आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची आहे. विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला. त्यानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीवर त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. हे महत्त्व लक्षात घेऊनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र येणार का? याबात चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देणार का? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरे याबाबत गेल्या काही दिवसांमध्ये सकारात्मक संकेत देत आहेत. पण, त्याचवेळी त्यांच्या पक्षात आऊट गोईंग वाढले आहे.
इनकमिंग कमी आऊटगोईंग जास्त!
एकनाथ शिंदे यांनी 2022 साली उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केलं. या बंडाची तीव्रता इतकी होती चिन्हासह शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटात मोठी पोकळी निर्माण झाली. शिंदे यांच्या बंडाला तीन वर्ष उलटली आहेत. त्यानंतरही ठाकरे गटाला लागलेली गळती सुरुच आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंगपेक्षा आऊटगोईंगच वाढले आहे. उद्धव ठाकरे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्ते पदाधिकारी यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना निराशा सहन करावी लागत आहे. हे असं का होतंय? ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्ष सोडून का जात आहेत? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : Uddhav - Raj : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार? नगरसेवकांच्या बैठकीतून मोठे अपडेट )
साहेबांचा नाही वहिनींचा दबदबा!
द्धव ठाकरे गटाचा नाशिकचा चेहरा असणाऱ्या सुधाकर बडगुजर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बडगुजर यांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, त्यांच्या घरी गेल्यानंतर तासंतास बसवून ठेवतात. यामागे रश्मी वहिनींचा हात आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे. रश्मी वहिनी सांगतात तसंच साहेब (उद्धव ठाकरे) वागतात, असं मत काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून चर्चेत असलेले भरत गोगावले यांनी देखील माध्यमांशी बोलताना रश्मी वहिनींकडं बोट दाखवलं. द्धव ठाकरे कायमच रश्मी वहिनींचे ऐकतात. अनेक वेळेला कार्यकर्त्यांना मातोश्री वरून उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच परतावे लागल्याचं त्यांनी उघडपणे सांगितलं.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील अनेक वेळा त्यांच्या भाषणातून रश्मी ठाकरे यांचीच सत्ता चालते असं सांगितलेलं होतं. वारंवार उद्धव ठाकरेंना देखील घरातून बाहेर पडा आणि मग जग बघा असे सल्ला दिल्याचा दावा राणे यांनी केला आहे.
नाशिकमधील ठाकरे गटाच्या नेत्या किरण दराडे यांनी मंगळवारी (17 जून) शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत त्याचबरोबर विकासासाठी निधी मिळत नाही. विकास झाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला मतदार कशी साथ देतील? हा विचार करून मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याचे सांगितले.
माजी कार्यकर्त्यांचे आरोप
उद्धव ठाकरे लवकर भेटत नाही. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटातील डोंबिवलीतील पदाधिकारी कविता गावंड यांनी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना भेट देत नव्हते. अनेक वेळेला रश्मी ठाकरे यांना डोंबिवलीला कार्यक्रमांना बोलावले मात्र त्या कधीच आल्या नाहीत, असं सांगितलं. राजन विचारे यांच्याकडे जायला वेळ होता मात्र डोंबिवलीतील गरीब कार्यकर्त्यांनी भरवलेल्या कार्यक्रमाला यायला त्यांच्याकडे वेळ नव्हता असेही गावंड यांनी सांगितले.
ठाकरे गटातील या फाटाफुटीला खासदार संजय राऊत जबाबदार असल्याचा दावा देखील अनेकांनी केला आहे. संजय राऊत यांचा निर्णयप्रक्रियेत मोठा हस्तक्षेप असतो. इतकच नव्हे तर बाळासाहेब असताना जी वागणूक आम्हाला मिळत होती तशी वागणूक आम्हाला मिळत नाही अशी तक्रारही कार्यकर्त्यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे पाठीशी उभं राहतील ही खात्री!
काही दिवसांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील आर्थिक गणित बसवावे लागते. हे आर्थिक गणित बसवण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम नाहीत असं देखील म्हटलं जात आहे. प्रत्येक माजी नगरसेवकाला एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी खंबीर उभे राहतील याची खात्री आहे.
अनेक कार्यकर्त्यांची घरे राज्यातील वेगवेगळ्या कंत्राटवर चालतात. हे कंत्राट संपले किंवा काढून घेतले गेले तर घरच चालणे बंद होईल अशी भीती देखील त्यांच्या मनात सतावत आहे. नेतेमंडळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर छोटे छोटे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. भाजप किंवा महायुतीतील कोणत्याही पक्षात गेले तर आपली हे गुन्हे माफ होतील असे देखील या कार्यकर्त्यांना वाटते अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका कार्यकर्त्यांनी एनडीटीवी मराठीशी बोलताना दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world